Snakebite incidents during Shravan month
जावेद मुलाणी
इंदापूर: श्रावणातील अनेक सणांपैकी नागपंचमीसुद्धा असेच एक पर्व आहे. श्रावण महिन्यातील आराध्य दैवत भगवान शंकराला मानले जाते. तसेच हा पावसाळ्याचा ऋतू असतो. या काळात सर्प व नाग बिळातून बाहेर पडून जमिनीवर येतात. बाहेर पडलेल्या या प्राण्यांना कोणताही अपाय होऊ नये म्हणून पूजा करण्यात येऊ लागली, ज्याला नागपंचमी असे म्हटले जाते.
आधुनिकतेच्या काळात तांत्रिक क्षेत्रात तर विस्तार झाला आहेच; पण आजही नागपंचमीसारख्या पर्वाचे महत्त्व कमी झालेले नाही. नागदेवतेची पूजा करण्यासोबत आजकाल नागांच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत, असे सर्पमित्र प्रा. धनंजय देशमुख, वैभव जाधव, राहुल लोणकर, प्राध्यापक सोपान भोंग यांनी सांगितले. (Latest Pune News)
सापांबद्दल श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नको, नागाच्या प्रतीकात्मक चित्राची पूजा केली जाते. वारुळावर जाऊन दूध, लाह्या, हळदी-कुंकू वाहिल्या जातात. शहरात वारूळ दिसत नाहीत. त्यामुळे नागाची प्रतिकृती असलेल्या फोटोची पूजा केली जाते.
साप असा करतो दंश
साप दंश करतो तो पायाला किंवा हाताला, बाकी अवयवांच्या ठिकाणी फार कमी दंश होतात. साप जेव्हा दंश करण्याच्या तयारीत असतो तेव्हा तो एका सरळ रेषेत झेप घेऊन बरोबर भक्ष्यावर नेम साधतो. झेप घेत असताना साप तोंड उघडतो त्या वेळी त्याच्या विषारी सुळ्या दातांची ठेवण सरळ उभी बनते. हे उभे विषाचे दात भक्ष्याच्या अंगात रोवल्यानंतर त्या विषारी दातांच्या वर लागून असलेल्या विषग्रंथीतून विष भक्ष्याच्या अंगात जाते. ज्याप्रमाणे औषधाच्या ड्रॉपरवर दाब दिला असता औषधाचा थेंब बाहेर येतो, त्याप्रमाणे हे विष भक्ष्याच्या शरीरात पोहचते.
मृत्यू होतोच, असे नाही
सामान्यपणे सर्पदंशामुळे मृत्यू होतो, असे नाही. विषारी सापाने दंश केला असता त्याने विषाची मात्रा किती प्रमाणात शरीरात सोडली, त्यावर तो दंश धोकादायक आहे किंवा नाही, हे अवलंबून असते. अनेक विषारी सापांचे दंश हे काही वेळी कोरडेच असू शकतात.आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती, मानसिकता कशी आहे, यावर परिणाम दिसून येतो; म्हणजेच या दोन्ही प्रकारांत विषारी सापाने दंश केला तर माणूस मरतोच असे नाही. मात्र, पुरेसे विष दंश झाल्यानंतर सोडले असेल, तर मात्र मृत्यू येऊ शकतो.
सापाच्या विषाचे प्रकार :
सापाच्या विषाचे दोन प्रकार पडतात 1) न्यूरोटॉक्सिक (मज्जाबाधक सर्पदंश). हे विष मज्जासंस्था किंवा चेतासंस्थेवर अनिष्ट परिणाम करते. नाग, मण्यार यांचे विष या प्रकारात मोडते. यामध्ये दंश झालेल्या जागी वेदना होतात, तर कधी कधी वेदनाही होत नाहीत, चावलेल्या जागी सूज येते, डोळ्यांपुढे अंधारी येते, पापण्या जड होतात, पाय थरथरतात, बोलणे अडखळते, श्वास घेण्यास त्रास होतो, दम लागणे अशी लक्षणे दिसून येतात.
2) हेमोटॉक्सिक (रक्तबाधक सर्पदंश). हे विष रक्त व रक्तवाहिन्यांवर परिणाम करते, ज्यामुळे रक्त गोठण्यास किंवा रक्तस्राव होण्यास सुरुवात होते. घोणस व फुरसे यांचे विष या प्रकारात मोडते. नाडी जलद चालणे, शरीर थंड पडू लागणे, डोळ्यांच्या भावल्या प्रसरण पावणे, मळमळल्यासारखे होणे, अशक्तपणा वाटणे तसेच यामध्ये दंश झालेल्या भागातून रक्तमिश्रित द्रव पाझरू लागतो, नाक, हिरड्या, लघवी, गुदद्वार इत्यादीतून रक्तस्राव सुरू होतो, साधारणपणे चोवीस तासांनंतर मूत्रपिंडाचे कार्य बंद झाल्याने रोग्याला अतिमूत्रता आजार होऊन विष रक्तात पसरू लागते. या दोन्ही प्रकारामध्ये वेळीच व योग्य वैद्यकीय उपचार घेतल्यास व्यक्तीचा मृत्यू टाळता येतो.
सर्पदंश झाला असता तो दंश विषारी सापापासून की बिनविषारी सापापासून झालेला आहे, हे सर्पदंशाच्या खुणावरून सहज समजून येते. जर विषारी साप चावला असेल तर दंशाच्या ठिकाणी दोन ठळक खुणा (सुळ्या विषारी दातामुळे) व त्याच्या खाली इंग्रजीतील ण ( ’यू’ ) आकारात खुणा स्पष्टपणे आढळून येतात.
परंतु, बिनविषारी साप चावला असेल तर दोन ठळक खुणा दंशाच्या जागेवर आढळून येत नाहीत, म्हणजेच फक्त ण (यू) या आकाराच्या खुणा आढळतात. कारण, बिनविषारी सापाच्या वरच्या जबड्यामध्ये विषाचे दात नसतात. जर आपल्याला निश्चित असे समजले की, त्या व्यक्तीस विषारी सापापासून दंश झाला आहे तर त्याला त्वरित प्रथमोपचार देऊन ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेणे आवश्यक आहे.
सर्पदंशावरील प्रथमोपचार :
सर्पदंश झालेल्या व्यक्तीला वैद्यकीय उपचारांसाठी दवाखान्यात नेण्यापूर्वी काही प्राथमिक उपचार करणे आवश्यक आहेत. यामध्ये दंश झालेल्या व्यक्तीच्या भोवती गर्दी करू नये, शांतता राखावी, त्याला घाबरू न देता धीर द्यावा.
सर्पदंश झालेल्या भागाच्या वरच्या बाजूस ताबडतोब आवळपट्टी बांधावी, त्यामुळे रक्ताभिसरण सहज थांबेल. सर्प विषप्रतिबंधक लस उपलब्ध असलेल्या जवळच्या रुग्णालयात त्या व्यक्तीला त्वरित हलवावे. परंतु, कोणत्याही प्रकारची हालचाल अथवा परिश्रम त्या व्यक्तीला करू देऊ नये. सर्पदंश झालेल्या व्यक्तीने वांती केल्यास त्याला उजव्या किंवा डाव्या कुशीवर झोपवावे, असे केल्याने त्याला श्वासोच्छवासास अडथळा येणार नाही, तो सहज होईल.
सर्पदंशावरील वैद्यकीय उपचार-
सर्पदंश झाल्यावर त्वरित वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे. सर्पदंशावर उपचार म्हणून सापाच्या विषापासूनच तयार केलेले अँटिवेनम दिले जाते, जे सापाच्या विषाचा शरीरावर होणारा परिणाम कमी करते. भारतात सर्वत्र आढळणार्या अत्यंत विषारी असलेल्या चार प्रकारच्या सापांच्या दंशावर हाफकिन इन्स्टिट्यूट, मुंबई या संस्थेने विषप्रतिबंधक लस तयार केलेली असून, ती अत्यंत परिणामकारक आहे. ही विषप्रतिबंधक लस सर्व शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मोफत उपलब्ध असते. त्यामुळे सर्पदंशामुळे मृत्यू पावणार्यांच्या संख्येत काही प्रमाणात का होईना आळा बसू लागला आहे.
हे आहे अत्यंत महत्त्वाचे
सर्पदंश झालेली व्यक्ती दगावली आहे, असे वाटल्यास डॉक्टरांना विनंती करून दंश झालेल्या व्यक्तीच्या जांघेत टेथेस्कोप लावण्यास विनंती करावी. कधी कधी नाडी, हृदय चालत नाही, असे दिसल्यास जांघेतील नाडी चालू राहते, असे लक्षात आलेले आहे. या वेळी अनस्थेशिया (भूलतज्ज्ञ) डॉक्टरांची मदत योग्य ठरते.