पुणे: पत्नीच्या निधनानांतर दोन लहान मुलांची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. मात्र, परिस्थितीपुढे हार न मानता त्यांनी स्वतःच्या वेदना बाजूला ठेवल्या आणि मुलांसाठी नव्याने जगण्याचा निर्धार केला. शाळेच्या डब्यापासून ते गृहपाठापर्यंत, आजारपणातील काळजीपासून ते भावनिक आधारापर्यंत प्रत्येक जबाबदारी त्यांनी आई-वडील अशा दोन्ही भूमिकांतून निभावली. आज त्यांची मुलगी आणि मुलगा स्वतःच्या पायावर उभे आहेत आणि आपल्या वडिलांचा आधार बनले आहेत. ही कहाणी आहे सुरेश गायकवाड (नाव बदलले आहे) यांची.
आज अनेक एकल पिता मुलांची जबाबदारी उत्कृष्टरीत्या पेलत असून, पत्नीच्या निधनानंतर, घटस्फोटानंतर किंवा इतर कारणांमुळे मुलांच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी खांद्यावर आलेले हे एकल पिता आज समाजासमोर कर्तव्य, त्याग आणि निःस्वार्थ प्रेमाचा नवा आदर्श उभा करीत आहेत. रविवारी (दि. 21) साजऱ्या होणाऱ्या जागतिक पितृ दिनानिमित्त म्हणजेच फादर्स डेनिमित्त दै. 'पुढारी'ने काही एकल पित्यांशी संवाद साधला.
त्या संवादातून समोर आली ती त्याग, संघर्ष, प्रेम आणि जबाबदारीची एक हळवी बाजू. पहाटे उठून मुलांचा डबा बनविणे, त्यांना शाळेसाठी तयार करणे, अभ्यास घेणे, त्यांच्या भावना समजून घेणे, प्रत्येक यशात आनंद साजरा करणे आणि अपयशात खंबीरपणे पाठीशी उभे राहणे, या साऱ्या जबाबदाऱ्या ते एकहाती पार पाडत आहेत. स्वतःचे दुःख मनात दडवून मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलावे, यासाठी ते झटत आहेत. काळाच्या ओघात अनेक वडील आपल्या मुलांसाठी आई आणि वडील अशा दोन्ही भूमिका समर्थपणे पार पाडताना दिसत आहेत.
आज समाजात एकल पित्यांची संख्या वाढत असून, त्यांच्या संघर्षाकडे संवेदनशीलतेने पाहण्याची गरज आहे. पत्नीच्या निधनानंतर एकट्याने संसाराचा गाडा ओढणारे सागर कळसकर म्हणाले, दीड वर्षापूर्वी पत्नीचे निधन झाले आणि आई, मुलगा व मुलीची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आली. वयोमान आणि आजारपणामुळे आईला फारशी मदत करणे जमत नाही. त्यामुळे नोकरी सांभाळत घरातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.
मुलांना शाळेत सोडण्यापासून ते त्यांच्या प्रत्येक गरजेची काळजी घेण्यापर्यंत सर्व काही करावे लागते. आईची जागा कोणी घेऊ शकत नाही, हे खरे आहे. पण, मुलांसाठी आई आणि वडील दोन्ही बनण्याचा प्रयत्न करीत आहे. मुलांशी मैत्रीचे नाते निर्माण केले आहे. त्यांना समजून घेत, त्यांच्या भावनांना आधार देत पुढे जात आहे. त्यांचे हसूच माझी ताकद आहे.
वाढती एकल पित्यांची संख्या
घटस्फोट, विभक्त राहणे, जोडीदाराचे निधन प्रमुख कारणे.
शहरी भागात एकल पालकत्वाचे प्रमाण वाढतेय.
मुलांच्या संगोपनासाठी झटताहेत वडील.
समाजात एकल पित्यांविषयीचा दृष्टिकोन बदलतोय.