पेठ : पुढारी वृत्तसेवा : पावसाची वाट पाहून शेतकरी हताश झाले आहेत. आज-उद्या कधीतरी पाऊस पडेल, या आशेवर शेतकर्यांनी आपल्या शेतात ज्या भागात पाणी उपलब्ध होईल तेथे विहिरी खोदण्याचे काम सुरू केले आहे. पूर्वी 25 ते 30 एकर क्षेत्र जमिनीसाठी एकच विहीर असायची, परंतु आता जमिनीतील हिस्से वाढल्याने तुकडे पडले तसे पाणीवाटप, आठवड्यात असलेल्या बार्या, कमी वीजपुरवठा, पाण्याची खोल गेलेली पातळी यामुळे ज्या शेतकर्याकडे दोन ते अडीच किंवा पाच एकर शेती क्षेत्र आहे, ते पण आता स्वतःच्या शेतात विहिरी खोदत असल्याने विहिरींची संख्या एकाच गटात एक वरून दोन ते तीनच्या वर गेली आहे. वीस वर्षांत तिप्पट ते चौपट विहिरीची संख्या वाढली आहे.
जर्मन तंत्रज्ञान किंवा स्थानिक पातळीवर असलेले जुन्या पिढीतील पाणाडे हे विहिरीचे पाणी दाखविण्याचे काम करत आहेत. दोन हजार ते पाच हजार रुपये विहिरींचे पाणी सांगणारी व्यक्ती घेत आहेत. चाळीस ते पन्नास फूट खोल विहिरी ही जेसीबीच्या साहाय्याने केली जात आहे. सध्या पाऊस पडत नाही त्यामुळे भूमिगत पाणीपुरवठा कमी होत आहे. अनेक शेतकर्यांनी आता खोदलेल्या विहिरींना पुरेसे पाणी मिळत नाही. अशा एका विहिरीला जेसीबीने खोदाई करण्यासाठी चार ते पाच लाख रुपये खर्च येत असल्याचे शेतकरी गोरक्षनाथ दाते, आदिनाथ दाते यांनी सागितले.
सातगाव पठार भागात पाऊस नसल्याने शेतकरी जुन्या विहिरीतील गाळ, दगड-गोटे काढणे, आडवा बोअर मारणे, खोलीकरण करणे यासाठी अट्टहास करत आहेत. कशाला मातीत पैसे गुंतवितो, असे प्रश्न नातेवाईक विचारतात, तरी शेतकरी आज ना उद्या पाऊस पडेल या आशेवर विहिरी खोदकाम करत आहे. त्यासाठी बँकेचे दरवाजे ठोठावत आहेत. विहीर हे आमचे आर्थिक गणित आहे. आज ना उद्या पाऊस झाला तर विहिरीमध्ये पाण्याचा साठा होईल पिके डोलतील. कमी पावसावर सरकारने तोडगा काढून शेतकर्यांना विहिरी खोदाई, नवीन विहिरी करणे यासाठी कर्जावर शून्य किंवा कमीत कमी व्याज दर आकारून कर्ज देण्यासाठी बँका व सरकारने निर्णय घेतला पाहिजे, असे मत शेतकरी सोपानराव नवले यांनी व्यक्त केले.
हे ही वाचा :