धायरी: सिंहगड रोडवरील विठ्ठलवाडी ते माणिकबाग हा उड्डाणपूल पूर्ण होऊनही तो अद्याप खुला करण्यात आला नाही. सत्ताधारी नेत्यांना उद्घाटनासाठी वेळ न मिळाल्याने जनतेला वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.
वाहतूक कोंडीसारख्या ज्वलंत प्रश्नाकडे सरकार दुर्लक्ष करीत असून, शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकार्यांनी पुणे शहराच्या वतीने विठ्ठलवाडीत आगळेवेगळे आंदोलन केले. (Latest Pune News)
सिंहगड रोडवरील नवीन उड्डाणपुलावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अजित पवार आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेसमोर ‘ॐ फट् स्वाहा’ म्हणत होमहवन करून पूल जनतेसाठी सुरू करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनादरम्यान सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीत अडकविणार्या सरकारचा निषेध होवो, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
या वेळी शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले, “पुलाचे काम जनतेच्या कररूपी पैशातून पूर्ण झाले असूनही केवळ सत्ताधार्यांच्या उद्घाटन सोहळ्याच्या हव्यासापोटी नागरिकांची गैरसोय केली जात आहे.
आज पुण्यातच असले तरी मुख्यमंत्री फडणवीस उड्डाणपुलाचे उद्घाटन करायला आले नाहीत. कारण, फक्त दोन दिवसांच्या पावसात या नव्या पुलावर खड्डे पडले आहेत. पुढील पाच दिवसांत पूल सरकारने सुरू केला नाही तर शिवसेना स्वतःच्या पद्धतीने जनतेसह या पुलाचे उद्घाटन करेल.
या प्रसंगी गजानन थरकुडे, उपशहरप्रमुख भरत कुंभारकर, महिला आघाडीच्या पद्मा सोरटे, सचिन पासलकर, संतोष गोपाळ, नितीन वाघ, महेश मते, गोकूळ करंजवणे, अनंत घरत, किशोर राजपूत, महेश पोकळे, अमोल दांगट, सुरज लोखंडे, वैभव हनमघर, पराग थोरात, दिलीप पोमण, राजाभाऊ चव्हाण, शिवा पासलकर तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी आंदोलनस्थळी पुणे मनपाचे प्रकल्पाधिकारी उपस्थित होते. त्यांनी येत्या 4 दिवसांतसर्व कामे पूर्ण करून उड्डाणपूलसुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले.