पुढारी ऑनलाईन डेस्क : शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमोल कोल्हे विजयी झाले आहेत. १ लाख ५३ हजार मताधिक्याने त्यांनी विजय मिळवला आहे. कोल्हे यांनी अजित पवार गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला असला तरी, हा खरा पराभव उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच मानला जात आहे.
१५ व्या फेरीअखेर अमोल कोल्हे यांनी ७२ हजार मतांची निर्णायक आघाडी घेतली होती. तर १४ व्या फेरीत त्यांना ३ लाख ८३ हजार ४५५ मते मिळाली होती. आढळराव पाटील यांना या फेरीत ३ लाख १८ हजार ४३० मते मिळाली. निवडणूक प्रचारादरम्यान अजित पवार यांनी शिरूर मतदारसंघात महायुतीचा उमेदवार निवडून आणणारच, असा निर्धार केला होता. तसेच यावेळी बिनकामाचा नको, तर कामाचा माणूस म्हणून आढळराव यांना लोकसभेत पाठवा, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले होते. मतदारांनी मात्र अजित पवार यांना धक्का देत पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांना कौल दिला आहे.
राज्यात लोकसभा निवडणुकांचे पाच टप्पे घेण्यात आले. या निवडणुकीची मतमोजणी ३९ ठिकाणी करण्यात येत आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणी केंद्रांवर प्रत्येक फेरीगणिक आकडेवारी जाहीर करण्यात येत आहे. मतमोजणीच्या साधारण २५ ते २८ फेऱ्या होण्याची शक्यता असून काही ठिकाणी मतदानाची टक्केवारी कमी असल्याने मतमोजणीच्या फेऱ्या कमी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :