मांडवगण फराटा: पिंपळसुटी (ता. शिरूर) येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. यावर संतप्त नागरिकांनी वन विभागावर रोष व्यक्त केला. त्यानंतर वन विभागाने परिसरात १३ पिंजरे लावले आहेत.
मांडवगण फराटा, पिंपळसुटी, इनामगाव या गावात बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेले आहेत. या स्थितीतही पूर्व भागात महावितरण रात्री व अपरात्री केव्हाही भारनियमन करत आहे. रात्रीचे भारनियमन करू नये, वाड्या-वस्त्यांवर किमान सिंगल फेज वीजपुरवठा करावा, अशी मागणी सातत्याने होत आहे.
पूर्व भागात एवढे बळी जाऊनही महावितरण त्यास गांभीर्याने का घेत नाही, असा संतप्त सवाल नागरिकांनी अधिकाऱ्यांना केला. तर वनविभाग केवळ बळी गेल्यानंतरच उपाययोजना केली जाते का? जिवंत असताना लोकांच्या तक्रारी गांभीर्याने का घेत नाही, असाही सवाल अनेकांनी उपस्थित केला.
बिबट्याच्या हल्ल्यानंतर नागरिकांनी वन विभागाला धारेवर धरल्याने अधिकारी वर्गाने तत्काळ कार्यवाहीला सुरुवात केली. या वेळी जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, सहाय्यक उपवनसंरक्षक स्मिता राजहंस, वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे, पशुवैद्यकीय अधिकारी अविनाश विसलकर, वनपाल भानुदास शिंदे, नितीन म्हात्रे, वनरक्षक गणेश डोईफोडे, गणेश झिरपे, नारायण राठोड, जालिंदर सानप, नानासो चव्हाण, शरीफ शेख यांसह रेस्क्यू पथकातील कर्मचारी उपस्थित होते.
त्यांनी घटनास्थळ व परिसरात एकूण १३ पिंजरे ठेवले आहेत. तसेच, ड्रोन व थर्मल कॅमेरे यांच्या माध्यमातून बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केले. दरम्यान, शिरूरच्या पूर्व भागात इनामगाव १, मांडवगण फराटा २, पिंपळसुटी २ अशी एकूण पाच बिबट्याच्या बळीची संख्या झाली आहे. यात बहुतांश मृत हे लहान मुलेच आहेत.