पुणे

‘शासन आपल्या दारी’ पुन्हा पुढे ढकलले ; कार्यक्रम चौथ्यांदा रद्द

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे उद्या (दि. 23) होणारा 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम पुन्हा पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे शासकीय अधिकार्‍यांनी गेल्या अनेक दिवसांपासून केलेले नियोजन कोलमडत असून, ज्या नागरिकांना दाखले किंवा प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, त्यांना आणखी काही काळ ताटकळत बसावे लागणार आहे. चौथ्यांदा कार्यक्रमाचा मुहूर्त चुकत आहे. प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना तसेच जय्यत तयारी करण्यात येणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांना याचा मोठा फटका बसत असून, कोट्यवधी रुपयांचा खर्ची घातलेला निधीदेखील वाया जात असल्याचे स्पष्ट होत आहे. आधी 1 जुलै, 13 जुलै त्यानंतर 23 जुलै अशा तारखा 'शासन दारी' कार्यक्रमासाठी निश्चित करण्यात आल्या. त्यासाठी तयारीही सुरू होती.

मात्र, हवामान विभागाने पुणे जिल्ह्यात पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला, त्यामुळे पुन्हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.जिल्हाधिकार्‍यांपासून प्रांत, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांपासून इतर सर्व वरिष्ठ अधिकारी हे अहोरात्र नियोजनात व्यस्त होते. मात्र, कार्यक्रम पुन्हा पुढे ढकलला जात असल्याने अधिकार्‍यांमधून देखील नाराजी व्यक्त केली जात आहे.

बर्फी विरघळली, खिचडी भिजली
'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाचे13 जुलै रोजी आयोजन करण्यात आले होते. त्याचे पूर्ण नियोजन करण्यात आले असून, जवळपास 35 ते 40 हजार नागरिकांसाठी नाष्ट्याची सोय करण्यात आली होती. त्यानुसार उपस्थितांसाठी बर्फी आणि साबुदाण्याची खिचडी दिली जाणार होती. त्यासाठी केटरिंग व्यावसायिकाला काम देण्यात आले. मात्र, ऐन वेळी हा कार्यक्रम रद्द झाल्याने सुमारे 100 किलो भिजवून ठेवलेला साबुदाणा वाया गेला. तर 100 किलो बर्फीचे काय करायचे, असा प्रश्न उपस्थित झाला होता.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT