सुनील जगताप
पुणे: पश्चिम महाराष्ट्रातील डोंगरदऱ्यांचा राजा पुन्हा आपल्या सामाज्यावर राज्य करण्यासाठी सज्ज झाला आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सह्याद्री व्याघ प्रकल्पात वाघांचे अस्तित्व भक्कम करण्यासाठी वन विभागाने कंबर कसली असून, विदर्भातील ताडोबातून वाघांचे स्थलांतर करण्याच्या प्रकल्पाला वेग आला आहे. जैवविविधतेचा ‘शिरपेचात मानाचा तुरा’ रोवणाऱ्या या प्रकल्पामुळे केवळ निसर्गाचे रक्षणच होणार नाही, तर पर्यटनाच्या माध्यमातून ग््राामीण अर्थव्यवस्थेलाही नवी झळाळी मिळणार आहे.
सह्याद्रीच्या पट्ट्यात वाघांची नैसर्गिक पैदास वाढविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. ताडोबा-अंधारी व्याघ प्रकल्पातून वाघ आणून ते कोयना आणि चांदोलीच्या घनदाट अरण्यात सोडले जाणार आहेत. ‘नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी’च्या मान्यतेनंतर आता भक्ष्यांची संख्या वाढविणे आणि रेडिओ कॉलरद्वारे देखरेख ठेवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सह्याद्रीच्या जागतिक वारसास्थळाचे नैसर्गिक आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात पसरलेल्या सह्याद्री व्याघ प्रकल्पाच्या बळकटीकरणासोबतच आता नव्या कॉरिडॉरच्या विकासावर भर दिला जाणार आहे. नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटीने पश्चिम महाराष्ट्रात वाघ सोडण्यास तत्त्वतः मान्यता दिली आहे. कोयना अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान यांचा समावेश असलेल्या ’सह्याद्री’मध्ये वाघांसाठी पोषक वातावरण तयार केले जात आहे.
वाघांच्या अन्नासाठी सांबर, चितळ आणि भेकर, यांसारख्या तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. राधानगरी ते तिलारी आणि पुढे कर्नाटकच्या सीमेपर्यंत वाघांच्या जाण्या-येण्याचा मार्ग सुरक्षित केला जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ प्रकल्प किंवा बह्मपुरी वनक्षेत्रातून वाघ आणण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात साधारणपणे तीन मादी वाघांचा समावेश आहे. या वाघांना कोयना अभयारण्य (सातारा) आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान (सांगली-कोल्हापूर) या भागातील घनदाट जंगलात सोडण्यात आले आहे.
काय आहे नेमका प्रकल्प?
सध्या अस्तित्वात असलेल्या सह्याद्री व्याघ प्रकल्पात वाघांचे वास्तव्य स्थिर करण्यासाठी ‘व्याघ पुनर्वसन’ प्रकल्प राबविला जात आहे. याअंतर्गत चंद्रपूर (ताडोबा) येथून काही वाघ पश्चिम महाराष्ट्रात आणले जाणार आहेत. यामुळे या पट्ट्यात वाघांचा कायमस्वरूपी वावर वाढण्यास मदत होणार आहे.
पर्यटनाला मिळणार चालना
या प्रकल्पामुळे पश्चिम महाराष्ट्रातील इको-टुरिझमला मोठी चालना मिळणार आहे. व्याघ प्रकल्पामुळे या भागातील जंगलांचे संरक्षण अधिक कडक होणार असून, स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. होम-स्टे, गाइड्स आणि सफारीच्या माध्यमातून ग््राामीण अर्थव्यवस्थेला बळकटी येईल.
आपल्याकडे मोठी जागा आणि वाघांना सामावून घेण्याची क्षमता असलेला व्याघ प्रकल्प असणे ही मोठी गोष्ट आहे. वाघ सोडण्याचा शासनाचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. वन विभाग तिथे उत्तम काम करीत आहे. मात्र भविष्यात या प्रकल्पावर योग्य देखरेख करणे गरजेचे आहे.अनुज खरे, सदस्य, महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ
सद्य:स्थितीत आत्तापर्यंत एकूण तीन वाघ (मादी) सोडण्यात आले आहेत. या वाघांना चांदोली (दोन वाघ) आणि कोयना (एक वाघ) या भागांत सोडण्यात आले आहे. आगामी काळात एकूण 12 वाघ सोडण्याचे उद्दिष्ट असले, तरी सध्या या सोडलेल्या वाघांवर आणि एकूणच जंगलातील एकूण वातावरणाचा अभ्यास सुरू आहे.तुषार चव्हाण, (क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ प्रकल्प)