पुण्याचा विकास करण्यासाठी रस्त्यांचे जाळे आवश्यक; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन Pudhari Photo
पुणे

पुण्याचा विकास करण्यासाठी रस्त्यांचे जाळे आवश्यक; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

‘पुणे अर्बन डायलॉग आव्हाने आणि उपाय’ कार्यक्रमाचे उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

पुणे: भविष्यातील पुण्याचा विकास करण्यासाठी मोठ्या रस्त्यांचे जाळे विणणे आवश्यक आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा संपूर्ण विकास आराखडा रद्द करून नव्याने रस्त्यांची निर्मिती करायची असून, नगररचना योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा विचार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केले. पीएमआरडीएच्या माध्यमातून महानगर एकीकृत वाहतूक प्राधिकरण तयार करण्यात येणार असल्याचे देखील फडणवीस म्हणाले.

यशदा, बर्वे चॅरिटेबल ट्रस्ट, इंटरनॅशनल सेंटर आणि पुणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने यशदा येथे आयोजित ‘पुणे अर्बन डायलॉग : आव्हाने आणि उपाय’ कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, या वेळी ते बोलत होते.

या प्रसंगी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, विजय शिवतारे, बापूसाहेब पठारे, हेमंत रासने, माजी मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, यशदाचे महासंचालक निरंजन सुधांशू, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राची 50 टक्के लोकसंख्या 500 शहरांत आणि उर्वरित लोकसंख्या 40 हजार गावांत राहते. शहरांचा चेहरा आपण बदलू शकल्यास 50 टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन देऊ शकतो. यासाठी ‘पुणे अर्बन डायलॉग’सारखे मंथन आवश्यक आहे. भविष्यात रस्त्यांचे मॅपिंग करण्यात येणार आहे. यासाठी गुगलसोबत करार केला जाणार आहे.

या माध्यमातून सिग्नलचे सिमुलेशन करून वाहतूक व्यवस्थापन केले जाणार आहे. पुण्यात पीएमपीएमएल बसव्यवस्थेला मेट्रोची जोड देऊन वाहतूकव्यवस्था बळकट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी मेट्रोला फिडर सेवा करणे गरजेचे आहे. त्या द़ृष्टीने प्रयत्न सुरू असून, त्यासाठी पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण तयार करण्यात आले आहे.

देशातील अनेक शहरे झाली बकाल

देशातील शहरे आज बकाल झालेली दिसतात. ग्रामीण भागातील नागरिक शिक्षण, आरोग्य, नोकरी, संधी, मनोरंजन आदींसाठी शहरात येतात. अशा परिस्थितीत आपण गृहनिर्माण केले नाही, तर झोपडपट्टी तयार होतात, नदी-नाले बुजवून अतिक्रमणे होतात. शहरे वाढल्यामुळे घनकचरा, सांडपाणी, पिण्याच्या पाण्याची समस्या, निर्माण होते आणि शहरे व्यवस्थापनाच्या बाहेर गेलेली, शाश्वत आणि राहण्यायोग्य राहिली नाहीत, हे अचानक लक्षात येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT