बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती, इंदापूर आणि पुरंदर तालुक्यांतील काही भागाला वरदान ठरलेल्या निरा डाव्या कालव्याचे आवर्तन जवळपास महिनाभरापासून सुरळीतपणे सुरू आहे. त्यामुळे परिसरातील शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. चालू वर्षी बारामती तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने विहिरी, नद्या- नाले, तळी यांची पाणीपातळी घटली आहे. जानेवारीपासूनच पाण्याचे दुर्भीक्ष जाणवणार आहे. सध्या निरा डाव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे गहू-हरभरा तसेच तरकारी पिकांना फायदा होत आहे. चालू वर्षी वीर धरण संपूर्ण भरले नसल्याने अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र, जलसंपदा विभागाने पाण्याचे योग्य नियोजन केल्याने शेतीला मुबलक आणि वेळेत पाणी मिळत आहे.
संबंधित बातम्या :
निरा डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू असल्याने बारामती आणि इंदापूर तालुक्यांच्या बागायती पट्ट्याला दिलासा मिळाला आहे. पिकेही हिरवीगार आहेत. बारामती आणि इंदापूर तालुक्यांतील छत्रपती, माळेगाव आणि सोमेश्वर कारखान्यांसह परिसरातील ऊसतोडणी मजुरांनाही जनावरांसाठी, धुणी-भांडी, वापरण्यासाठी या कालव्याच्या पाण्याचा उपयोग होत आहे. या तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठे आहे. कायमस्वरूपी आणि हक्काचे पाणी मिळत असल्याने उसासह तरकारी पिकांचे मोठे उत्पन्न या ठिकाणी घेतले जाते.
मुबलक पाणी असल्याने शेतीतील उत्पन्न वाढले असून, शेतकर्यांना याचा फायदा होत आहे. पालेभाज्या, फळबागा, ऊस यांच्यासह शेतात नवनवीन प्रयोग राबविले जात आहेत. दोन्ही तालुक्यांतील शेतकर्यांना निरा नदी आणि निरा डाव्या कालव्यांद्वारे शेतीला पाणीपुरवठा होत आहे.
डाव्या कालव्याला पाणी असल्याने विहिरींची पाणीपातळी टिकून राहण्यात मदत झाली आहे. तसेच छोटे उद्योगधंदे, मत्स्यपालन यांनाही याचा उपयोग होत आहे. जानेवारीपासून मात्र बागांच्या पट्ट्यालाही पाण्याची झळ बसणार असून, शेतीला पाणीपुरवठा करताना अडचण निर्माण होणार आहे. अवकाळी पावसाने बारामतीकरांना काहीसा दिलासा दिला असला तरीही चालू वर्षे झालेल्या अत्यल्प पावसामुळे बारामती तालुका हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे.