पुणे

शिरसाई कालव्याला पाणी सोडा; उंडवडी सुपे ग्रामस्थांची मागणी

अमृता चौगुले

उंडवडी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : उंडवडी सुपे (ता. बारामती) परिसरात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. दि. 17 जून रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा उंडवडी सुपे येथे मुक्कामी येत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने शिरसाई कालव्याला आवर्तन सोडावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. उंडवडी सुपे परिसरात पाण्याची टंचाई जाणवत आहे. जून महिना सुरू होऊन आठवडा लोटला, तरी अद्याप पाऊस न पडल्याने ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. पावसाळी वातावरण निर्माण होत आहे; मात्र वारे सुटत आहे. त्यानंतर पाऊस पडत नाही. एखाद् दुसरा मोठा पाऊस पडला असता, तर शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असता.

जर पाऊस लांबला तर पाण्याचा प्रश्न गंभीर होईल. याशिवाय दि. 17 जूनला उंडवडी सुपे येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा मुक्कामी आहे. त्यामुळे वारकर्‍यांची पाण्याअभावी गैरसोय होऊ नये. त्यामुळे वेळेत शिरसाई कालव्याला पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शिरसाई कालव्यातून उंडवडी सुपे पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीजवळील तलावात दि. 10 जूनपर्यंत पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी प्रांताधिकारी, तहसीलदार यांना केली आहे. त्यांनी पाणी सोडण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गवळी यांनी सांगितले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT