वेल्हे: पुणे जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या राजगड तालुक्यात यंदा जून महिना संपत आला, तरी मान्सूनपूर्व किंवा मान्सूनचा पाऊस झालेला नाही. परिणामी, तालुक्यातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, हजारो नागरिकांना दररोज पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. रुळे गावातील डोंगरमाथ्यावर वसलेल्या काळूबाई व भोपळी धनगरवाड्यांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून या वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. स्थानिक जलस्रोत पूर्णपणे आटल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी प्रशासनावर अवलंबून राहावे लागत आहे. तालुका प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात पिकअप जीपद्वारे दररोज सुमारे एक हजार लिटर पाण्याचा पुरवठा सुरू केला असला, तरी तो अपुरा ठरत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.
डोंगराळ भागातील कच्चे रस्ते आणि मोठ्या प्रमाणावर असलेले दगड-गोटे, यामुळे पाणी वाहतूक करणाऱ्या वाहनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यातच या रस्त्यावरील मोठमोठे दगड बाजूला करताना एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. खराब रस्त्यांमुळे वाहनांना हादरे बसून पाणीगळतीही होत असल्याने प्रत्यक्षात ग्रामस्थांपर्यंत कमी पाणी पोहचत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
या भागात काही वर्षांपूर्वी राबविण्यात आलेल्या शिवकालीन पाणी साठवण योजनेअंतर्गत उभारलेली तळी सध्या कोरडी पडली आहेत. तसेच तळी, विहिरी आणि इतर पाणवठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने त्यांची पाणी साठवणक्षमता लक्षणीयरीत्या घटली आहे. गाळ काढण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रुळेच्या सरपंच शुभांगी हळंदे आणि ग्रामस्थांनी अनेकदा संबंधित विभागांकडे गाळ काढण्यासाठी निधीची मागणी केली.
मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पावसाने आणखी विलंब केल्यास येत्या काही दिवसांत पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तळी आणि विहिरींचे गाळमुक्तीकरण तातडीने करून पाणी साठवणक्षमता वाढविणे आवश्यक आहे. तसेच, डोंगरवाडी भागांसाठी कायमस्वरूपी जलपुरवठा योजना राबविण्याची मागणीही जोर धरत आहे.