पुणे

पुरंदरचा चविष्ट वाटाणा यंदा बाजारातून गायब

अमृता चौगुले

दिवे : पुढारी वृत्तसेवा :  पुरंदर तालुक्यातील मुख्य पीक वाटाण्याचे आहे. दरवर्षी तालुक्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल या पिकातून होत असते. अगदी राज्यभरातील खवय्ये पुरंदरच्या गोड वाटाण्याची अगदी आवर्जून वाट पाहत असतात; परंतु या वर्षी पावसाचे पाठ फिरवल्याने वाटाणा उत्पादक शेतकर्‍यांनाच वाटाणा विकत घेण्याची वेळ आली आहे. वाटाण्याचे उत्पादन हे मध्य प्रदेश, ग्वाल्हेर, दिल्लीमध्ये सर्वाधिक घेतले जाते. महाराष्ट्रात पारनेर आणि पुरंदर भागात वाटाण्याची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली जाते. मात्र, पुरंदरचा वाटाणा आपल्या अप्रतिम चवीने राज्यात प्रसिद्ध आहे. या भागात अर्कल व गोल्डन या जातीच्या वाटाण्याची पेरणी केली जाते. आजसुध्दा पुणे, मुंबई येथील बाजारपेठेत बाहेरील वाटाण्याच्या तुलनेत येथील वाटाण्याला जास्तीचा बाजारभाव मिळत असतो.

संबंधित बातम्या :

पुरंदरमध्ये फळबागेव्यतिरिक्त वाटाण्यातून मोठी उलाढाल होत असते. स्थानिक सासवड, दिवे बाजारपेठेत बाहेरील पेण, मुंबई, सांगली, सातारा, महाड येथील व्यापारी वाटाणा खरेदीसाठी गर्दी करत असतात. त्यामुळे बाजारात मोठी उलाढाल होत असते. मात्र, यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने कोडित, गराडे या भागात तुरळक ठिकाणी वाटाणा पेरणी झाली आहे.

वाटाणा उत्पादक शेतकरी विठ्ठल राजिवडे, राजू बडधे यांनी त्यांच्या शेतात पिकवलेला वाटाणा दिवे येथील बाजारात विक्रीसाठी आणला होता. केवळ 45 रुपये प्रतिकिलो दराने हा वाटाणा विकला गेला. तर बाजारात अवघी 300 ते 350 किलो वाटाण्याची आवक झाली होती. त्यामुळे खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. सध्या परराज्यातील वाटाणा पुणे बाजारात मोठ्या प्रमाणात येत आहे.

आमच्याकडे वाटाण्याची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते; परंतु यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे विहिरीत पाणीच नसल्याने पेरणीच झालीच नाही. त्यामुळे आम्हालाच वाटाणा विकत घेण्याची वेळ आली आहे.
                         – शंकरनाना झेंडे, वाटाणा उत्पादक शेतकरी, झेंडेवाडी, ता. पुरंदर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT