Water Crisis Pudhari
पुणे

Purandar Water Crisis: पुरंदरमध्ये पाणीटंचाई तीव्र; विहिरी आटल्या, शेतकऱ्यांचा जीवघेणा संघर्ष

उष्णतेचा कहर, 41 अंशांपार पारा; पाणी मिळवण्यासाठी बळीराजाचा अखेरचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

वाल्हे: गतवर्षी वाल्हे (ता. पुरंदर) परिसरात अतिवृष्टी होऊनही सध्या वाढत्या उष्णतेमुळे नैसर्गकि पाणीस्रोत आटले आहे. जमिनीतील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. परिणामी, तालुक्यातील अनेक गावांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, प्रशासनाकडून अपेक्षित तत्परतेने उपाययोजना होत नसल्याने शेतकरी विविध मार्गांनी पाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

अनेक गावांतील विहिरींनी तळ गाठला असून, पाणीपातळी वाढविण्यासाठी विहिरीतील गाळ काढण्याचे तसेच अधिक खोल कूपनलिका घेण्याचे काम सुरू आहे. काही ठिकाणी विहिरींमध्ये आडव्या व उभ्या कूपनलिका मारण्याचे प्रयोगही सुरू आहेत. मात्र, पाणीपातळी खूप खोल गेल्याने त्याचा अपेक्षित फायदा होत नसल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. तरीही शेती आणि जनावरे वाचविण्यासाठी हेच पर्याय उरल्याचे ते सांगतात.

तालुक्यातील अनेक ठिकाणी जेसीबी, पोकलेन आणि क्रेनच्या साहाय्याने विहिरीतील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. 50 ते 60 फूट खोल विहिरींसाठी पोकलेनचा वापर केला जात असून, त्यापेक्षा खोल विहिरींसाठी क्रेनच्या मदतीने गाळ काढला जात आहे. पूर्वी हे काम शेतकरी एकत्र येऊन करीत असत; मात्र आता बाहेरील मजूर घ्यावे लागत आहेत. या कामासाठी मोठा खर्चही शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. क्रेन व मजुरांकडून प्रतिफूट 4 हजार 500 रुपये, तर पोकलेन व जेसीबीसाठी प्रतितास 4 हजार 500 रुपये मोजावे लागत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

शिरूरकर घामाघूम; पारा 41 पार!

शिरूर तालुक्यामध्ये उन्हाची तीवता प्रचंड वाढली आहे. हवेतील आर्द्रता कमी झाल्याने वातावरण कोरडे झाले आहे. या स्थितीमुळे शिरूरमधील पारा 41 अंशांपुढे गेला आहे. उष्णता वाढून नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. त्यातच महावितरण कंपनीच्या गलथान कारभार आणि अनियमित वीज पुरवठ्याने नागरिक हैराण झाले आहेत.

सध्या शिरूरकर विचित्र हवामानाचा अनुभव घेत आहेत. सकाळी नऊ वाजल्यापासून प्रचंड उकाडा जाणवतो. दुपारी अकरा वाजेनंतर सूर्य आग ओकतोय, अशीच परिस्थिती निर्माण होते. सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रचंड उकाडा असतो. यातच ढगाळ हवामान निर्माण होते. यामुळे वातावरणातील आर्द्रता कमी होऊन प्रचंड उष्णता वाढते. या उष्णतेचा ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना अधिक त्रास होत आहे. या उष्णतेतून दिलासा मिळावा म्हणून नागरिक उसाचा रस, शहाळे, ताक, लस्सी आदी शीतपेयांचा सहारा घेत आहेत. पुढील आठ दिवस उष्णतेची लाट अशाच पद्धतीने राहणार असल्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

दुसरीकडे, अवकाळीच्या भीतीतून शेतकऱ्यांना भर उन्हात कांदा काढावा लागत आहे. 41 अंश सेल्सिअस पारा असतानाही शेतकरी आणि शेतमजूर शेतामध्ये राबताना पाहायला मिळत आहे. अशा प्रचंड उकाड्याच्या स्थितीतच बहुतांश गावांत रात्री उशिरापर्यंत वीज नसते. यातून नागरिकांना प्रचंड उकाडा नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे महावितरणबाबत नागरिकांत संतप्त वातावरण निर्माण झाले आहे.

बळीराजाचा शेवटचा प्रयत्न

मागील वर्षी मान्सूनपूर्व पावसामुळे नदी-नाले, बंधारे भरून वाहिले होते. मात्र, समाधानकारक पर्जन्यमान होऊनही डिसेंबरअखेरपासून अनेक भागांत टँकर सुरू करावे लागले. सध्या विहिरी, कूपनलिका व इतर पाणीसाठे आटल्याने विहिरीतील गाळ काढून काही प्रमाणात पाणी वाढेल, या आशेने शेतकरी शेवटचा प्रयत्न करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT