Purandar airport economic impact
पुणे: जिल्ह्यात होणार्या नव्या (पुरंदर) विमानतळ आणि रिंगरोड या दोन मोठ्या प्रकल्पांमुळे पुण्याच्या अर्थव्यवस्थेवर 3 लाख कोटी रुपयांचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. एखाद्या क्षेत्रावर वर्चस्व गाजवणार्या एका शहराची स्थिती आता उरलेली नाही. महाराष्ट्रातील अनेक शहरे झपाट्याने प्रगती करत आहेत.
मात्र, पुणे हे प्रचंड प्रगतशील आणि नाविन्यतेचे केंद्र असून, नव्या क्षेत्रांत पदार्पण करून आपले सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता या शहरात आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. (Latest Pune News)
नीती आयोग, महाराष्ट्र शासन आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘यशदा’मध्ये आयोजित ‘पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब’च्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम, पुणे इंटरनॅशनल सेंटरचे प्रमुख पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, “भविष्यात पुणे निश्चितच झपाट्याने भरारी घेईल आणि त्यासाठी ‘ग्रोथ हब’च्या माध्यमातून तयार होणारा विकास आराखडा महत्त्वपूर्ण ठरेल. ‘पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब’ला गती देण्याचे काम नीती आयोग करणार आहे. यासंबंधीचा आराखडा महाराष्ट्र शासन आणि पीएमआरडीए तयार करणार असून, पुणे इंटरनॅशनल सेंटर त्याला मदत करणार आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित प्रगतीसाठी हे मनुष्यबळ फार महत्त्वाचे ठरते. आज एआय तंत्रज्ञान सर्वच क्षेत्रांत आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. त्याचा योग्य उपयोग करून देशाच्या जीडीपीमध्ये वाढ साधता येईल. पुण्यातील विशिष्ट क्षमतांवर आधारित, त्यांचे बदलते स्वरूप लक्षात घेऊन योग्य नियोजन केल्यास दरडोई उत्पन्नही वाढवता येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.
शिंदे म्हणाले, “पुणे हे तंत्रज्ञान, उद्योग, उत्पादन, शिक्षण आणि आरोग्य सेवा यांसारख्या क्षेत्रांत अग्रेसर आहे. याशिवाय, पर्यटन क्षेत्रातही इथे मोठी क्षमता आहे. त्यामुळे महानगर क्षेत्रातील ‘ग्रोथ हब’ ही संकल्पना निश्चितच यशस्वी ठरेल. मात्र, शहरांसोबत ग्रामीण भागाचाही समविकास होणे आवश्यक आहे. ’ग्रोथ हब’च्या माध्यमातून शहराचा विकास ग्रामीण भागापर्यंत पोहोचवता येईल. विकासासाठी रस्ते जोडणी आणि पायाभूत सुविधा उभारणी अत्यंत महत्त्वाची आहे.”