रामदास डोंबे
खोर: जिल्ह्याच्या विकासाचा पुढील टप्पा ठरू पाहणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय पुरंदर विमानतळामुळे दौंड तालुक्याच्या विकासालाही मोठी झेप घेण्याची संधी निर्माण झाली आहे. विमानतळ पुरंदर तालुक्यात उभारले जाणार असले, तरी त्याच्या भौगोलिक जवळकीचा आणि मजबूत दळणवळणाच्या सुविधांचा सर्वाधिक फायदा घेणाऱ्या भागांमध्ये दौंडचा समावेश होऊ शकतो. त्यामुळे 'पुरंदर विमानतळ दौंडच्या विकासाचे टेकऑफ' ठरण्याची शक्यता आहे.
दौंड तालुका हा जिल्ह्यातील महत्त्वाचा रेल्वे आणि औद्योगिक केंद्रबिंदू आहे. दौंड-कुरकुंभ औद्योगिक पट्टा, रेल्वेचे महत्त्व, प्रमुख रस्ते आणि मोठ्या बाजारपेठांशी असलेली जोडणी यामुळे तालुक्याला आधीपासूनच विशेष महत्त्व आहे. त्यात पुरंदर विमानतळाची भर पडल्यास दौंडच्या आर्थिक विकासाला नवी गती मिळू शकते.
उद्योगांना मिळणार नवी संधी
कुरकुंभ औद्योगिक परिसराला विमानतळाच्या माध्यमातून जलद दळणवळणाची सुविधा मिळाल्यास नव्या उद्योगांना आकर्षित करण्याची क्षमता वाढेल. उत्पादन, औषधनिर्मिती, अभियांत्रिकी, अन्नप्रक्रिया आणि निर्यात क्षेत्रातील उद्योगांसाठी विमानतळाची जवळीक महत्त्वाची ठरू शकते. परिणामी स्थानिक पातळीवर गुंतवणूक वाढून रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
शेतीमालाला मोठी बाजारपेठ
दौंड तालुका शेतीप्रधान असल्याने विमानतळाचा सर्वात महत्त्वाचा फायदा कृषी क्षेत्राला मिळू शकतो. फळे, भाजीपाला, फुले तसेच प्रक्रिया केलेल्या कृषी उत्पादनांना जलद वाहतुकीची सुविधा उपलब्ध झाल्यास पुण्यासह देशातील आणि परदेशातील बाजारपेठांपर्यंत पोहोचण्याच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात. यासाठी तालुक्यात कोल्ड स्टोअरेज, गोदामे, पॅकिंग सेंटर, कृषी प्रक्रिया उद्योग आणि लॉजिस्टिक हब उभारण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना केवळ उत्पादनावर नव्हे, तर मूल्यवर्धन आणि थेट बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करता येईल.
रोजगाराची नवी दारे होणार खुली
विमानतळाच्या अनुषंगाने वाहतूक, हॉटेल व्यवसाय, लॉजिस्टिक, सुरक्षा, तांत्रिक सेवा, गोदाम व्यवस्थापन, पर्यटन आणि विविध सेवा क्षेत्रांचा विस्तार होण्याची शक्यता आहे. यामुळे दौंडमधील युवकांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी मिळू शकतात.
आतापासूनच नियोजनाची गरज
पुरंदर विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यरत होण्याची प्रतीक्षा करण्यापेक्षा दौंडने आतापासूनच भविष्यातील संधींचे नियोजन करणे आवश्यक आहे. औद्योगिक गुंतवणूक, लॉजिस्टिक पार्क, कृषी प्रक्रिया, कौशल्य विकास आणि रोजगारनिर्मिती यासाठी दीर्घकालीन आराखडा तयार झाल्यास विमानतळाचा लाभ अधिक व्यापक पद्धतीने स्थानिकांना मिळू शकतो.
पायाभूत सुविधांचे दौंड तालुक्यापुढे आव्हान
विमानतळामुळे निर्माण होणाऱ्या संधींचा फायदा घेण्यासाठी दौंडमधील रस्ते, रेल्वेजोडणी, अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, वीज, इंटरनेट आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे आवश्यक आहे. विमानतळाकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांशी दौंडला प्रभावीपणे जोडणे ही काळाची गरज ठरणार आहे.