दिगंबर दराडे
पुणे: प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाच्या मोबदल्याबाबतचे पॅकेज अंतिम टप्प्यात पोहोचले असून, येत्या गुरुवारपासून शेतकऱ्यांना मोबदला वाटप करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. राज्य शासनाने यासाठी सुमारे सहा हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असून, संबंधित यंत्रणांना निधी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया पूर्णत्वाकडे गेली आहे.
पुरंदर विमानतळासाठी देण्यात येणारा एकरी दर जिल्हाधिकारी दोन दिवसात जाहीर करणार आहेत. पुरंदर तालुक्यातील सुमारे सात गावांमधील जमीन या प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणार आहे. या संदर्भात बहुतांश शेतकऱ्यांनी जमीन देण्यास तत्त्वतः सहमती दर्शवली असली, तरी मोबदल्याच्या दरावरून काही ठिकाणी नाराजीही व्यक्त करण्यात आली होती. यामुळे पॅकेज निश्चित करण्यास विलंब झाला होता.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, निधी वितरणासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होत असून, प्रत्यक्ष वाटपाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. निधी मिळताच मोबदला थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. यामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेला गती मिळेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, काही अहवालांनुसार मोबदला दर निश्चिती आणि निधी वितरणात झालेल्या विलंबामुळे जमीन संपादनाची मुदत पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सुमारे १,२०० हेक्टरहून अधिक जमिनीचे अधिग्रहण पूर्ण करण्यासाठी आणखी काही महिने लागू शकतात.
पुरंदर विमानतळ प्रकल्पामुळे पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील औद्योगिक, आयटी, पर्यटन आणि कृषी क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाकडे राज्यभरातून लक्ष लागले असून, आता प्रत्यक्ष मोबदला वाटप सुरू होण्याची प्रतीक्षा शेतकरी आणि स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.