पुणे: शहरालगतच्या गावांमध्ये वाढती लोकसंख्या, औद्योगिक वसाहतींमुळे स्थलांतरित कामगारांची वाढती संख्या आणि उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दूरवर जावे लागण्याच्या अडचणी लक्षात घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पाचवीपर्यंत मर्यादित असलेल्या शाळा आता आठवीपर्यंत सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली असून, ज्या शाळांमध्ये आधीच आठवीपर्यंत वर्ग आहेत, त्या ठिकाणी दहावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण व क्रीडा समितीची बैठक उपाध्यक्ष आणि सभापती विवेक वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत शहरालगतच्या गावांमधील तसेच औद्योगिक परिसरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक स्तर वाढविण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
सध्या जिल्हा परिषदेच्या 3 हजार 521 शाळांमध्ये सुमारे 2 लाख 38 हजार 920 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी 345 शाळा पाचवीपर्यंत असून, 110 शाळांमध्ये आठवीपर्यंत शिक्षण उपलब्ध आहे. आता पाचवीपर्यंतच्या शाळांमध्ये आठवीपर्यंत वर्ग सुरू करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी गावाबाहेर जाण्याची गरज कमी होणार असून, शाळा सोडण्याचे प्रमाणही घटण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील सुमारे 1000 शाळांपैकी 303 शाळांचे ‘मॉडेल स्कूल’मध्ये रूपांतर करण्यात येत आहे, तर उर्वरित 606 शाळांसाठीही असेच नियोजन सुरू आहे. बैठकीत मॉडेल शाळांचा आढावा घेण्यात आला तसेच शिक्षकांच्या पदोन्नती, रिक्त पदे भरणे आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासंदर्भात चर्चा झाली.
याशिवाय, शासन आणि परीक्षा परिषद आयोजित परीक्षांव्यतिरिक्त इतर कोणत्याही खासगी संस्थांच्या परीक्षा जिल्हा परिषद शाळांमध्ये घेऊ नयेत, असा निर्णयही घेण्यात आला. “पाचवीच्या पुढे शिक्षण उपलब्ध झाल्याने विशेषतः मुलींच्या शिक्षणाला चालना मिळेल आणि शिक्षणाचा दर्जा उंचावेल,” असे विवेक वळसे पाटील यांनी सांगितले. या निर्णयामुळे ग््राामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.