पुणे / येरवडा: प्रदूषणाच्या कारणावरून शहरातील आरएमसी प्लांट शहराबाहेर हलवण्याची भूमिका घेतली जात असताना येरवड्यात मात्र डांबर प्लांटला परवानगी कशी दिली जाते, असा संतप्त सवाल महापालिकेच्या मुख्य सभेत नगरसेवकांनी उपस्थित केला. येरवड्यातील नागरिक गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून डांबर प्लांटचा त्रास सहन करत असताना त्याच ठिकाणी आणखी एक प्लांट सुरू केल्याचा आरोप करत प्रशासनाला धारेवर धरण्यात आले.
नगरसेवक सुहास टिंगरे, अश्विनी लांडगे आणि विशाल मलके यांनी येरवड्यातील डांबर प्लांटचा मुद्दा उपस्थित केला. टिंगरे यांनी सांगितले की, प्लांट सुरू करू नये, यासाठी चार महिन्यांपूर्वी प्रशासनाकडे ठराव दिला आहे. मात्र, अद्याप त्यावर प्रशासनाचा अभिप्राय मिळालेला नाही. गेल्या सहा महिन्यांपासून प्रत्येक स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रश्न उपस्थित करूनही प्रशासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.
आरएमसी प्लांटमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी ते शहराबाहेर हलवण्याची भूमिका महापौर मंजूषा नागपुरे मांडत आहेत. मग येरवड्यातील नागरिक तीन दशकांहून अधिक काळ त्रास सहन करत असताना जुना प्लांट हटवण्याऐवजी त्याच ठिकाणी नवा डांबर प्लांट का सुरू केला, असा सवाल टिंगरे यांनी केला. शिंदेवाडी येथील आरएमसी प्लांटला आपला विरोध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले; कारण तो शहराबाहेर आहे.
येरवड्यातील नागरिकांना त्वचा व श्वसनाच्या आजारांचा त्रास होत असल्याचा दावा लांडगे यांनी केला. भरवस्तीत प्लांट असल्याने वाहतुकीवरही परिणाम होत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मलके यांनी नागरिकांचा विरोध असतानाही आणि एमपीसीबीची मान्यता नसतानाही प्लांट सुरू केल्याचा आरोप केला. या आरोपांनंतर महापौर नागपुरे यांनी संबंधित प्लांटची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आश्वासन दिले. प्रश्न उपस्थित करणारे नगरसेवक, आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांसह पाहणी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
‘झीरो एमिशन’चा दावा कितपत खरा?
येरवड्यातील नव्या प्लांटमधून प्रदूषण होत नसल्याचा आणि तो 'झीरो एमिशन' असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, प्लांट सुरू करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची (एमपीसीबी) आवश्यक परवानगी होती का, असा प्रश्न टिंगरे यांनी उपस्थित केला. परवानगी नसतानाही प्लांट सुरू करून सुमारे २०० टन माल तयार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. 'झीरो एमिशन'चा दावा खरा असेल, तर शहरात अशाच प्रकारचे आरएमसी प्लांट सुरू करण्यास प्रशासन परवानगी देणार का, असा सवाल त्यांनी केला.