पुणे: ‘अल निनो’च्या संकटाची शक्यता असल्याने पुण्याला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे महापालिकेने ठरवले असले तरी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पाणीकपात केली तरी पुरेशी ठरेल, असे मत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. धरणात तीन महिने पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. ७० टक्के पाऊस पडला तरी धरणे भरतात. त्यामुळे या सर्व बाबींचा अंदाज घेत महापालिकेने नियोजन करण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.
खडकवासला साखळी प्रकल्पातील चारही धरणांमध्ये बुधवारी (दि.१०) एकूण ४.८१ टीएमसी एवढा साठा आहे. धरणातून शहराला महिन्याला १.५ टीएमसी पाणी दिले जाते. शहराला ३१ जुलैपर्यंत म्हणजेच पुढील ५१ दिवसांसाठी २.६५ टीएमसी पाणी लागणार आहे. हा पाणीपुरवठा करून देखील धरणात १.५ टीएमसी पाणी शिल्लक राहील. पालखी सोहळ्यासाठी आणखी अर्धा टीएमसी पाणी दिले तरी शिल्लक राहिलेले एक टीएमसी पाणी २० ऑगस्टपर्यंत पुरणार आहे. त्यात बाष्पीभवनामुळे अर्धा टीएमसी पाणी कमी झाले तरीदेखील खडकवासला प्रकल्पात ४.५० टीएमसी पाणी म्हणजे पुण्याला जवळपास तीन महिने पुरेल एवढे पाणी उपलब्ध असल्याचा दावा जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांनी केला आहे.
अल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनचा पाऊस यंदा देशात सरासरीच्या ९० ते ९२ टक्के पडेल, असा अंदाज हवामान विभागाने एप्रिलमध्ये वर्तविला. त्यामुळे ऑगस्टअखेर पिण्यासाठी पाणी पुरेल, एवढा पाणीसाठा धरणात आरक्षित करण्याचा आदेश जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाला दिला. त्यामुळे पुणे महापालिकेने १५ टक्के पाणीकपात करावी, अशी सूचना जलसंपदा विभागाने एप्रिलमध्ये केली होती. याबाबत ३१ मेनंतर निर्णय घेण्याचे महापालिकेने ठरविले होते. मात्र, आता १५ जूनपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा म्हणजे जवळपास ४० ते ५० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय महापालिकेने जाहीर केला आहे.
१ ऑक्टोबर २०२५ रोजी खडकवासला साखळी प्रकल्पात २९ टीएमसी पाणीसाठा होता. सध्या ४.८१ टीएमसी पाणीसाठा आहे. रब्बी हंगामात शेतीला ३.७७ टीएमसी पाणी देण्यात आले. (दि. ९-१२-२०२५ ते १०-२-२०२६ पर्यंत) उन्हाळा शेतीला पहिले आवर्तन यंदा दि. १७ फेब्रुवारी ते ११ मेपर्यंत ६.९७ टीएमसी पाणी देण्यात आले. उन्हाळी दुसरे आवर्तन १२ मेपासून सुरू केले आहे. दोन्ही आवर्तन मिळून ९.३३ टीएमसी पाणी शेतीला देण्यात आले. त्यापैकी १२ मे ते ९ जूनपर्यंत २.३६ टीएमसी पाणी शेतीसाठी देण्यात आले आहे.
उन्हाळी शेतीसाठी यंदा सर्वाधिक १०.५ टीएमसी पाणी
राजकीय दबावामुळे यंदा उन्हाळी आवर्तनासाठी जवळपास १०.५ टीएमसी पाणी शेतीला देण्यात आले. १८ फेब्रुवारीपासून ३० एप्रिलपर्यंत हे पाणी देण्यात येणार होते. मात्र, आता या आवर्तनातून १५ जूनपर्यंत जवळपास साडेतीन महिने रोज ०.१ टीएमसी पाणी दिले जात आहे. गेल्या सात ते आठ वर्षांत यंदा उन्हाळी आवर्तनासाठी सर्वाधिक पाणी वापरले गेले. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मागणीमुळे उन्हाळी हंगामासाठी पाण्याचे आवर्तन १५ जूनपर्यंत वाढवले. आगामी आठवड्यात आणखी अर्धा टीएमसी पाणी शेतीला देण्यात येणार आहे. आ. रोहित पवार यांच्या मागणीमुळे जानाई शिरसाई योजनेसाठी ठरल्यापेक्षा यंदा दुप्पट पाणी म्हणजे सुमारे एक टीएमसी पाणी पुरवण्यात आले.
५ टीएमसी साठा; तरीही दिवसाआड पाणी का?
खडकवासला धरणसाखळीत १५ जूननंतरही चार टीएमसीहून अधिक पाणी उपलब्ध राहणार असताना महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठ्याचा विचार करणे अनावश्यक असल्याची भूमिका सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी मांडली आहे. या निर्णयामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागेल, तर दुसरीकडे टँकरमाफियांना चालना मिळण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
वेलणकर यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, ९ जून रोजी वरसगाव धरणात १.८७ टीएमसी, पानशेत धरणात २.२५ टीएमसी आणि खडकवासला धरणात ०.८२ टीएमसी, असा एकूण जवळपास पाच टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. शेतीसाठी सुरू असलेले आवर्तन आणि पुण्याच्या पाणीपुरवठ्याची गरज लक्षात घेतली, तरी १५ जूनपर्यंत धरणसाखळीत चार टीएमसीहून अधिक पाणी शिल्लक राहील, असा त्यांचा दावा आहे.
पालखी सोहळ्यासाठी अंदाजे अर्धा टीएमसी पाणी वापरले जाईल, असे गृहीत धरले तरी १५ जूननंतर साडेतीन टीएमसी पाणी उपलब्ध राहणार आहे. पुणे महापालिका दरमहा दीड टीएमसी पाणी खडकवासला धरणसाखळीतून उचलत असून, उर्वरित गरज भामा-आसखेड योजनेतून भागवली जाते. त्यामुळे उपलब्ध साठा सहजपणे ऑगस्टअखेरपर्यंत पुरू शकतो, असा दावा त्यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर १५ जूनपासून थेट एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याऐवजी १५ जुलैपर्यंत आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा पर्याय स्वीकारावा. त्यानंतर पावसाच्या स्थितीचा आढावा घेऊन आवश्यक असल्यास पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी सजग नागरिक मंचने केली आहे. पाणीपुरवठा कपातीबाबतचा कोणताही निर्णय घेताना नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम लक्षात घेऊनच प्रशासनाने भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही वेलणकर यांनी व्यक्त केली आहे.
७५ टक्के पाऊस झाला तरी धरणे भरतील
आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा पर्याय स्वीकारल्यास हा साठा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकू शकतो. भारतीय हवामान विभागाने यंदा सरासरीच्या ९० टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला असून, साधारण ७५ टक्के पाऊस झाला तरी खडकवासला धरणसाखळीतील धरणे भरतात, असे वेलणकर यांनी नमूद केले आहे.