पुणे: महापालिकेच्या पाणीपट्टीवसुलीत मागील दोन आर्थिक वर्षांच्या तुलनेत यंदा घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 42.98 टक्के पाणीमीटर बंद किंवा नादुरुस्त असल्याने पाणी वापराची अचूक नोंद होत नसून, त्याचा थेट परिणाम वसुलीवर होत आहे. यामुळे महापालिकेच्या अपेक्षित उत्पन्नावर परिणाम झाला असून, थकबाकी देखील वाढली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शहरात पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत विविध कामे सुरू आहेत. महापालिकेच्या हद्दीसह छावणी परिसराला देखील पाणीपुरवठा करताना पाणीपुरवठा विभागाला मोठी कसरत करावी लागत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणीसुद्धा वाढली आहे. त्यात पाणीगळतीमुळे पाण्याचा अपव्यय वाढला आहे. ही गळती रोखण्यासाठी पाणी मीटर बसवले जात आहे. मात्र, शहरासह हद्दीच्या बाहेरील 42.98 टक्के मीटर नादुरुस्त आहेत. यामुळे पाण्याचा अचूक वापर होतो की नाही याबाबत माहिती मिळत नसल्याने त्याचा परिणाम पाणीपट्टीवसुलीवर झाला आहे. त्यामुळे नादुरुस्त मीटर बदलून घ्यावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
खडकी आणि लष्कर या छावणी भागातील नागरिकांचे पाणीमीटर बदलण्याचे मोठे आव्हान मनपासमोर आहे. सध्या वापरात असलेले अनेक मीटर मेकॅनिकल तंत्रज्ञानावर आधारित असल्याने ते वारंवार नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे सरासरी वापर गृहित धरून आकारल्या जाणाऱ्या बिलांमुळे थकबाकीचा फुगवटा 899 कोटींपर्यंत पोहोचल्याचे दिसून येत आहे.
ही समस्या कमी करण्यासाठी समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरात मोठ्या प्रमाणावर पाणीमीटर बसविण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 1 लाख 95 हजार मीटर बसवले असून, एकूण 3.45 लाख मीटर बसविण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच सुमारे 1100 किलोमीटर जलवाहिन्या विकसित केल्या असून, 80 साठवण टाक्या उभारण्याचे आणि सुमारे 1600 किलोमीटर जलवाहिन्या टाकण्याचे कामही प्रस्तावित आहे. 2025-26 मध्ये टेलिस्कोपिक पद्धतीने पाणीपट्टी दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे कमी पाणी वापरणाऱ्यांना कमी दराने आणि जास्त पाणी वापरणाऱ्यांना अधिक दराने बिल आकारले जाणार आहे. भविष्यात अल्ट्रासॉनिक किंवा इलेक्ट्रो मॅग्नेटिक तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक पाणीमीटर बसविण्याचीही योजना असून, त्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थापन अधिक अचूक आणि पारदर्शक होईल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला.
सन 2026-27 या आर्थिक वर्षात शहरातील अनधिकृत नळजोड शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली जाणार असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. या सोबतच लोकअदालतींचे आयोजन करून थकबाकीदारांकडून पाणीपट्टीवसुली करण्यावर महापालिका भर देणार आहे.
समान पाणीपुरवठा योजनेनुसार पाणीमीटर बसविले जात आहेत. पाणीमीटर बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर थकबाकी 891 कोटींवरून जवळपास 300 कोटींपर्यंत कमी झालेली दिसून येईल.नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग, पुणे महापालिका
सन 2023-24 मध्ये पाणीपट्टीवसुली 150 कोटी रुपये सन 2024-25 मध्ये वसुली 154.46 कोटी रुपये सन 2025-26 मध्ये 31 जानेवारीपर्यंत वसुली 109.62 कोटी रुपये शहरात 40,212 नळजोडांवर सुमारे 891.51 कोटी रुपयांची थकबाकी