पुणे: महापालिका आणि पाटबंधारे यांच्या पाणीपट्टी थकबाकीच्या वादात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष घालणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच बैठक घेणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.
खडकवासला धरणसाखळीतून शहराला पाणीपुरवठा होतो. त्यासाठी पाटबंधारे विभागाने महापालिकेला 14.61 टीएमसी पाणी कोटा मंजूर केला आहे. मात्र, शहराची लोकसंख्या वाढल्याने महापालिकेला दरवर्षी जवळपास 21 टीएमसी पाणी उचलते. त्यामुळे पाटबंधारेकडून पालिकेला 15 टक्के व्यावसायिक दर आकारत असून, वापरलेल्या पाण्यावर पुनर्प्रक्रिया केली जात नसल्याने त्यावरून दंड आकारला जात आहे.
अशी एकूण तब्बल 928 कोटींची थकबाकी देण्याबाबत पाटबंधारे विभागाकडून महापालिकेला वारंवार पत्र पाठविले जात आहे. पालिकेचेच 411 कोटी पाटबंधारेकडे असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून केला जात आहे. त्यावर आता पाटबंधारेने ही थकबाकी न दिल्यास शहराचे पाणी कापण्याचा इशारा महापालिकेला दिला आहे. या सगळ्या पार्श्वभूूमीवर आयुक्त नवल किशोर राम यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत माहिती दिली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना दिली.