पुणे: वाढते शहरीकरण, वाढणारी लोकसंख्या आणि त्यातून निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे आव्हान लक्षात घेता, भविष्यात कचरा व्यवस्थापन अधिक गुंतागुंतीचे होणार आहे. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत कचऱ्यावर स्थानिकपातळीवरच प्रक्रिया करण्याच्या विकेंद्रित व्यवस्थेला प्राधान्य देणे, ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन नगरविकास विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केले.
त्या एव्हीके ग्रीन सोल्युशन्स प्रा. लि. यांनी विकसित केलेल्या अत्याधुनिक सेंद्रिय कचरा प्रक्रिया प्रकल्प, ओडब्ल्यूसी (ऑर्गनिक वेस्ट कन्व्हर्टर) यंत्रांचे लोकार्पण तसेच पर्यावरण प्रयोगशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या, कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात एव्हीके टेक्नॉलॉजी प्रभावी आणि यशस्वी ठरत असेल, तर अशा तंत्रज्ञानालाही शासनाच्या व्यवस्थेत योग्य त्या पद्धतीने सामावून घेण्याचा विचार केला जाईल.
पुणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते नीलेश निकम म्हणाले, नागरिकांना दुर्गंधीमुक्त आणि प्रभावी कचरा प्रक्रिया यंत्रणा उपलब्ध करून दिल्यास घरातील किंवा परिसरातील कचरा दूरवर पाठविण्याची गरज उरणार नाही. स्थानिकपातळीवरच त्याचे विघटन करता येईल. एव्हीके टेक्नॉलॉजीने विकसित केलेली ओडब्ल्यूसी मशीन यासाठी प्रभावी उपाय ठरू शकते.
मैथिली चंद्रात्रे यांनी या तंत्रज्ञानाची माहिती देताना सांगितले की, जैवविघटनशील घनकचऱ्याचे २४ ते ३६ तासांत सेंद्रिय खतामध्ये रूपांतर केले जाते. कचऱ्यावर त्याच ठिकाणी किंवा जवळच प्रक्रिया होत असल्यामुळे वाहतूक खर्च, इंधनाचा वापर आणि लॅंडफिलवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होतो. तसेच, ही संपूर्ण प्रक्रिया दुर्गंधीमुक्त असून, कमी मनुष्यबळात कार्यक्षमतेने चालविता येते. या कार्यक्रमास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी, पुणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते नीलेश निकम, मंजुश्री खर्डेकर, पिनाक ग्रुपचे संस्थापक दीनेश चंद्रात्रे, डॉ. कीर्ती चंद्रात्रे, मैथिली चंद्रात्रे-शेट्टी, अनुशा कुलकर्णी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कचरा व्यवस्थापन हा राज्यासमोरील गंभीर विषय : खा. कुलकर्णी
कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न हा केवळ पुण्यापुरता मर्यादित नसून, संपूर्ण राज्यासमोरील गंभीर विषय आहे. एका भागात निर्माण झालेल्या कचऱ्याचा भार दुसऱ्या भागातील नागरिकांनी का सहन करावा, असा प्रश्न उपस्थित करत खासदार मेधा कुलकर्णी यांनी उरुळी देवाची येथे कचरा साठविण्याच्या पद्धतीवर भाष्य केले. एव्हीके टेक्नॉलॉजीच्या प्रणालीत कचरा अनेक दिवस साठवून ठेवला जात नाही. अवघ्या २४ तासांत त्याचे सेंद्रिय खतामध्ये रूपांतर होते आणि संपूर्ण प्रक्रियेदरम्यान दुर्गंधीही निर्माण होत नाही. इतर पारंपरिक यंत्रणा आणि एव्हीके टेक्नॉलॉजीमधील हा महत्त्वाचा फरक असल्याचे त्यांनी प्रत्यक्ष पाहणीनंतर सांगितले.