

बारामती: आषाढी वारी तोंडावर आल्याने प्रवाशांसाठी एसटीने खास सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. वारीच्या काळात पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या अधिक असते. त्यानुसार महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळा(एसटी)ने तयारी केली आहे.
वाढत्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता बारामती बस आगाराकडूनही पंढरपूरसाठी बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 40 प्रवाशांनी एकत्रित आरक्षण केल्यास थेट गावात गाडी पाठविण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक प्रवीण शिंदे यांनी दिली.
वारकऱ्यांना असुविधा जाणवू नये, यासाठी बारामती आगाराने एसटी विभागाकडून जादाच्या गाड्या मागविल्या आहेत. आषाढी वारीसाठी एसटी फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा पंढरपूरला एसटी महामंडळाच्या बसने जाणाऱ्या वारकऱ्यांना बसची कमतरता भासणार नाही.
पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांनी अगोदर एसटी विभागाशी संपर्क साधून एसटी बुकिंग करावी, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे. वारकऱ्यांसाठी परिवहन महामंडळाने ग्रुप आरक्षणाची सुविधा दिली आहे. एकाच गावातील ४० जणांच्या समूहाने आरक्षण केल्यास त्यांच्या गावातून गाडी सोडण्यात येणार आहे.
या लोकांना घेण्यासाठी एसटी गावात जाईल. शिवाय दर्शन झाल्यावर पंढरपूर तेथून पुन्हा त्यांच्या गावी सोडेल. यामुळे प्रवाशांना थेट घरापासून पंढरपूरला जाण्याची सुविधा एसटीने उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.