पुणे: वाघोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दोन वेगवेगळ्या कौटुंबिक छळाच्या प्रकरणांत, सासरकडून होत असलेल्या हुंड्याच्या मागणीला कंटाळून दोन विवाहितांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या दोन्ही प्रकरणांत संबंधित सासरच्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
पहिल्या घटनेत रचिता अभिषेक गुप्ता (वय 37, रा. रविनंदा कॉयलाईट सोसायटी, वाघोली) यांना तब्बल 10 लाख रुपये हुंड्याची मागणी करून शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत होता. या सततच्या त्रासाला कंटाळून त्यांनी 16 एप्रिल रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पती अभिषेक सुरेशचंद्र गुप्ता (वय 31, रा. वाघोली) याला अटक केली आहे.
तसेच सासरे सुरेशचंद्र गुप्ता, सासू अनिता गुप्ता आणि प्राची गुप्ता (सर्व रा. शहीदनगर, आग््राा, उत्तर प्रदेश) यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. रचिता यांच्या भावाने याबाबत वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोघांचा 2021 मध्ये प्रेमविवाह झाला होता. तीन महिन्यांपूर्वीच ते उत्तर प्रदेशातून पुण्यात स्थायिक झाले होते.
पती मार्केटिंगची नोकरी करत होता, तर रचिता गृहिणी होत्या. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विनायक अहिरे करत आहेत. दुसऱ्या प्रकरणात, आव्हाळवाडी येथील शिवराज पार्क परिसरात प्रतीक्षा जयसिंग कदम (वय 21, रा. शिवराज पार्क, डोमखेलवस्ती) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पतीकडून वारंवार सोन्याची अंगठी व वाहनाच्या हप्त्यांसाठी पैशांची मागणी करून तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला जात होता, असा आरोप आहे.
याप्रकरणी पती जयसिंग मधुकर कदम (वय 29, रा. आव्हाळवाडी) याला अटक केली असून, अन्य एका महिलेवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांचा विवाह नोव्हेंबर 2023 मध्ये झाला होता. 16 एप्रिल रोजी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल काळे करत आहेत.