पुणे: शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा परिणाम फळभाज्यांच्या उत्पादनावर झाला आहे. पावसामुळे फळभाज्यांची अपेक्षित तोड होत नसल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील फळभाज्यांची आवकही रोडावली आहे. बाजारात दाखल झालेल्या फळभाज्यांची मागणीही कमी आहे. परिणामी, बहुतांश फळभाज्यांच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाल्याचे दिसून आले.
पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यासह सोलापूर, सांगली, सातारा व कोल्हापूर या भागांतून येणाऱ्या फळभाज्यांची आवक कमी होत आहे. पावसामुळे दर कमी होऊन नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी कमी प्रमाणात शेतमाल बाजारात विक्रीसाठी पाठवत आहे. मात्र, गुरुवारी दुपारनंतर शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील विविध मंडईमध्ये फळभाज्यांची अपेक्षित विक्री झाली नाही.
परिणामी, शुक्रवारी सकाळच्या सुमारास फळभाज्यांना मागणी कमी राहिली. याशिवाय, शहरातील व्यावसायिक गॅसटंचाईमुळे अनेक उपाहारगृहे व खानावळी बंद आहेत. त्यामुळे फळभाज्यांच्या मागणीतही घट कायम आहे. परिणामी, आवक घटल्यानंतरही दरही घसरल्याचे दिसून आले. शनिवारी साप्ताहिक सुटीमुळे बाजार बंद राहणार असून, रविवारी (दि. 5) फळभाज्यांची आवक पुन्हा नियमित होण्याची शक्यता तरकारी विभागाचे प्रमुख बाळासाहेब कोंडे यांनी व्यक्त केली.
रसदार फळांच्या खरेदीकडे ग््रााहकांची पाठ
अवकाळी पावसाचा फटका कलिंगड आणि खरबूज आदी रसदार फळांच्या विक्रीवर झाला आहे. जिल्ह्यासह अहिल्यानगर, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यांतून दोन्ही फळांची आवक होत आहे. कलिंगडाची दररोज 50 ते 60 टन, तर खरबुजाची 30 टन आवक होत आहे. उन्हाळ्यामुळे कलिंगड, खरबुजाला मोठी मागणी होती. मात्र, मागील काही दिवसांपासून शहरात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे.
गुरुवारी (दि. 2) पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खरेदीकडे ग््रााहकांनी पाठ फिरवली आहे. घाऊक बाजारात चार दिवसांपूर्वी किलोला दर्जानुसार 10 ते 15 रुपये भाव मिळणाऱ्या कलिंगडाला किलोला 7 ते 10 रुपये भाव मिळत आहे. तर, किलोला 20 ते 22 रुपये भाव मिळणाऱ्या खरबुजाला आता 10 ते 15 रुपये भाव मिळत आहे. सध्या मिळत असलेल्या दरामुळे उत्पादन आणि वाहतूक खर्च निघणेही अवघड झाल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र आहे.