पुणे: अवकाळी पावसाच्या फटक्याने शहरातील नागरिकांचे हाल झाले असतानाच, आता महापालिकेत पदाधिकाऱ्यांच्या बैठकींच्या ‘राजकारणा’मुळे प्रशासनाची अक्षरशः तारांबळ उडाल्याचे चित्र समोर आले आहे. पावसाने निर्माण केलेल्या संकटावर एकसंध उपाययोजना करण्याऐवजी प्रत्येक पदाधिकारी
आपत्ती नियोजनाच्या वेगवेगळ्या बैठका घेत असल्याने नेमके ऐकायचे कुणाचे? या संभमात महापालिकेचे अधिकारी पडले आहेत. पुण्यात गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसाने शहरवासीयांची तारांबळ उडवली. या पावसामुळे महापालिकेच्या विकासकामे चव्हाट्यावर आली.
यानंतर खडबडून जागे होत महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. या बैठकांना सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित राहत आहेत. शहरात उपाययोजना करण्याऐवजी वेगवेगळ्या पातळींवर होत असलेल्या बैठकींमुळे महापालिका प्रशासन नेमके कोणाचे आदेश पाळायचे? या संभमात पडले आहे.
अवकाळीनंतर तातडीने उपाययोजना करण्यासाठी महापौर मंजूषा नागपुरे यांनी सर्व विभागप्रमुख आणि आयुक्तांसोबत बैठक घेत प्रशासनाला फैलावर घेतले. मात्र, त्यानंतर एकत्रित नियोजनाऐवजी वेगवेगळ्या पातळींवर स्वतंत्र बैठकांचे सत्र सुरू झाल्याने पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव ठळकपणे समोर आला आहे.
सभागृहनेते गणेश बिडकर यांनीही सुटीच्या दिवशी आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेत स्वतंत्र बैठक घेतली. त्यानंतर पुन्हा सर्व खातेप्रमुखांसह बैठक घेऊन प्रशासनाकडून माहिती घेत सूचना देण्यात आल्या. या बैठकींना आयुक्त आणि अधिकारी उपस्थित असले, तरी इतर पदाधिकारी अनुपस्थित राहिल्याने राजकीय पातळीवरील विसंवाद अधोरेखित झाला.
महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृह नेते यांनी एकत्रितपणे बैठकांचे नियोजन करणे अपेक्षित असताना प्रत्येक जण स्वतंत्रपणे बैठक घेत असल्याने अधिकाऱ्यांचा गोंधळ उडाला आहे, तर दुसरीकडे या बैठकांना उपमहापौर उपस्थित राहत नसल्याने त्यांच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. अवकाळी पावसाच्या संकटानंतर शहरात एकत्रित बैठका घेऊन समन्वय साधण्याऐवजी पदाधिकारी स्वतंत्र बैठका घेत असल्याने याचा परिणाम प्रशासनाच्या कामकाजावर होत आहे.