Pune University Vande Mataram Pudhari
पुणे

Pune University Vande Mataram: ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने पुणे विद्यापीठ दुमदुमले; हजारो युवकांनी घेतला राष्ट्रनिर्मितीचा संकल्प

‘युवा की आवाज’ कार्यक्रमात तिरंगी ध्वजासह देशभक्तीपर गीतांचा जल्लोष; मोबाइल फ्लॅशलाईट्सने उजळले विद्यापीठाचे मैदान

पुढारी वृत्तसेवा

पुणे: देशभक्तीपर गीतांचे सूर, हजारो मोबाइलच्या फ्लॅशलाईट्सचा लखलखाट आणि युवाशक्तीच्या एकसुरातील 'वंदे मातरम्'चा जयघोष... अशा भारावलेल्या वातावरणात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परिसर शुक्रवारी 'वंदे मातरम्'च्या रंगात न्हाऊन निघाला.

युवकांमध्ये देशभक्तीची भावना आणि राष्ट्राभिमान जागृक व्हावा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने वंदे मातरम् कृती समिती, पुणे यांच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ 'युवा की आवाज' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वंदे मातरमचे सामूहिक गायन करण्यात आले. तसेच तिरंगी ध्वज हातात घेऊन आणि देशभक्तिपर गीते स्पीकरवर वाजवून तरुणाईने जल्लोष केला.

यावेळी 'भारत माता की जय', 'वंदे मातरम् के सन्मान में, देश का युवा मैदान में' अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. 'जिंदगी मौत ना बन जाए', 'सुनो गौर से दुनियावालों', 'कोई कहे कहता रहे', 'जय हो', 'जय जय जय महाराष्ट्र माझा', 'शूर आम्ही सरदार', 'वेडात मराठे वीर दौडले सात' अशा देशभक्ती आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला साद घालणाऱ्या गीतांनी वातावरण भारावून गेले होते.

या कार्यक्रमात 'वंदे मातरम्'च्या इतिहासाचेही स्मरण करण्यात आले. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या 'आनंदमठ' कादंबरीतून समोर आलेल्या या गीताला दीडशे वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यलढ्यातील त्याच्या योगदानावर प्रकाश टाकण्यात आला. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी १८९६ मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात हे गीत गायले आणि पुढे ते स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणागीत बनले.

कार्यक्रमाच्या अखेरीस मैदानावरील दिवे मंद करून हजारो मोबाईलचे फ्लॅशलाईट्स एकाच वेळी सुरू होताच विद्यापीठाच्या मैदानावर जणू नक्षत्रांचे आभाळच अवतरल्याचे चित्र निर्माण झाले होते. हातात मोबाईलची प्रकाशज्योत आणि ओठांवर 'वंदे मातरम्' घेऊन युवकांनी सामूहिक गायन केले. विकसित भारताच्या निर्मितीसाठी योगदान देण्याचा संकल्प करत या स्वरसंध्येची सांगता झाली.

आपण संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून वंदे मातरम् म्हणतो. मात्र, काँग्रेसमधील काही लोकांनी संपूर्ण वंदे मातरम् म्हणण्याला विरोध केला. त्यांनी देशाची, क्रांतिकारकांची आणि स्वातंत्र्यसेनानींची माफी मागितली पाहिजे. संविधानाचीही माफी मागितली पाहिजे. राष्ट्रभक्त युवक संपूर्ण वंदे मातरम् म्हणणार, हे काँग्रेसला दाखवू.
मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT