पुणे: जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाच्या रास्त आणि किफायतशीर किमतीपोटी (एफआरपी) देय रकमेचा एकूण आकडा 4 हजार 489 कोटी 14 लाख रुपये आहे. त्यापैकी 28 फेबुवारीअखेरच्या ताज्या अहवालानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रत्यक्षात 3 हजार 975 कोटी 5 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. तर, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या थकीत एफआरपीचा आकडा सुमारे 401 कोटी 85 लाख रुपये असल्याची माहिती साखर आयुक्तालयातून मिळाली.
काही कारखान्यांनी देय एफआरपी रकमेपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केल्याचेही अहवालावरून दिसून येते. ही रक्कम साधारणतः 32 कोटी रुपयांइतकी आहे. जिल्ह्यात यंदाच्या 2025-26 च्या हंगामात 15 कारखान्यांपैकी सद्य:स्थितीत 6 कारखान्यांनी एफआरपीची शंभर टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केलेली आहे. दौंड तालुक्यातील भीमा सहकारी हा कारखाना श्री साईप्रिया शुगर्स यांच्याकडून चालविला जातो.
या कारखान्याची देय एफआरपीची रक्कम 263 कोटी 61 लाख रुपयांइतकी आहे. या कारखान्याने त्यातील 134 कोटी 62 लाख रुपयेच शेतकऱ्यांना दिलेले असून, ही रक्कम देय एफआरपीच्या केवळ 35.55 टक्क्यांइतकी आहे. जिल्ह्यात 128 कोटी 99 लाख रुपयांइतकी सर्वाधिक थकीत एफआरपी भीमा सहकारी साखर कारखान्याची आहे. याबाबत येणाऱ्या पुढील पंधरवडा अहवालात भीमा सहकारीकडून थकीत एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना दिली जाण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली. असे असले तरी थकीत एफआरपीप्रश्नी साखर आयुक्तालय या कारखान्याबाबत कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.