सुनील जगताप
पुणे: शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला, तरीही अद्याप शालेय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाबाबत कोणतीही स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे हजारो शालेय खेळाडू, त्यांचे पालक आणि मार्गदर्शक शिक्षक संभ्रमावस्थेत असून, स्पर्धा नेमक्या कधी सुरू होणार, या प्रतीक्षेत ते ‘वेटिंग’वर आहेत.
दरवर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात तालुका, जिल्हा किंवा विभाग स्तरावरील विविध खेळांच्या स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर होऊन सामने रंगू लागतात. मात्र, यावर्षी प्रशासकीय दिरंगाईमुळे खेळाडूंच्या सरावावर आणि मानसिक तयारीवर मोठा परिणाम होत आहे. एका बाजूला खेळाडू क्रीडा कौशल्यांना पैलू पाडण्यासाठी कसून सराव करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला प्रशासनाकडून केवळ तांत्रिक कारणांचा पाढा वाचून वेळ मारून नेली जात आहे.
शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनात दरवर्षीच काही ना काही अडथळे आणले जातात. कधी निधीचा अभाव, कधी प्रशासकीय समन्वय नसणे तर कधी इतर तांत्रिक कारणे पुढे करून मुलांचे भवितव्य धोक्यात आणले जाते. याचा थेट परिणाम खेळाडूंच्या क्रीडा गुणांवर आणि त्यांच्या सवलतीच्या गुणांवर होतो. खेळाडूंच्या हक्काच्या स्पर्धा अशा प्रकारे रखडल्यामुळे शिक्षक आणि पालकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
शालेय क्रीडा स्पर्धा म्हणजे ग्रामीण व शहरी भागातील उगवत्या खेळाडूंना आपले कौशल्य दाखविणारे हक्काचे व्यासपीठ असते. प्रशासनाच्या अशा ढिसाळ कारभारामुळे अनेक होतकरू खेळाडू स्पर्धांपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने सर्व तांत्रिक अडथळे दूर करून शालेय क्रीडा स्पर्धांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करावे आणि खेळाडूंचा हा प्रतीक्षेचा काळ संपवावा, अशी आक्रमक मागणी पालक व क्रीडाप्रेमींमधून होत आहे.
दरवर्षी जुलै महिन्याच्या मध्यांतरीला शालेय स्पर्धा सुरू होत असतात. त्यानंतर विभागीय आणि राज्य पातळीवर स्पर्धा पार पडून राष्ट्रीय स्पर्धेत खेळाडू खेळत असतो. आता ऑगस्ट महिना उलटून ही स्पर्धा सुरू झालेल्या नाहीत. प्रशासनाचा भोंगळ कारभार यानिमित्ताने पुढे येत आहे.शरद काळे, क्रीडा प्रशिक्षक व संघटक
शालेय स्पर्धा सुरू होण्यामध्ये काही तांत्रिक अडचणी येत आहेत. परंतु, अलिकडच्या काळात या सर्व समस्या सोडविण्यात प्रशासनाला यश आलेले आहे. काही किरकोळ अडचणी दूर झाल्यानंतर त्वरित शालेय स्पर्धा सुरू होतील.जगन्नाथ लकडे, जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे