वैभव धाडवे पाटील
सारोळा: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचआय)च्या मुंबई कार्यालयाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 च्या पुणे-सातारा विभागाने भूमिगत गॅसवाहिनी टाकण्यासाठी टोरेंट कंपनीस मंजुरी दिली असली, तरी या दोन्ही विभागांचे या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याने कंपनीला मनमानी करण्याची संधी मिळाली आहे.
पुणे-सातारा महामार्ग सहा पदरीकरणाचे काम अद्याप अर्धवट अवस्थेत आहे. महामार्गाच्या कामात अनेक त्रुटी समोर येतात. भूसंपादनाचे विषय, अर्धवट सेवारस्ते, सूचनाफलक, खड्डेमय महामार्ग, पाऊस झाल्यास अनेक ठिकाणी पाण्याची तळी निर्माण होणे, पांढरे पट्टे नसणे, सेवारस्त्यावरील अतिक्रमणे तेथील गटारे करणे, वाहने उभी करण्याची सुविधा, तोडलेले रस्तेदुभाजक, चुकीचे उड्डाणपूल,
झालेले काम दर्जेदार नसल्यामुळे रोज होणारी वाहतूक कोंडी अशा अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत असतानाच.आता वाहनचालक, प्रवासी, परिसरातील लोक यांचा जीव धोक्यात येईल, अशा पद्धतीने नियमबाह्य सुरू असलेले गॅसवाहिनीचे काम नवे संकट बनून पुढे येत आहे.
महामार्ग प्राधिकरणाने दुर्लक्ष केल्यास भविष्यातील समस्या वाढू शकतात. महामार्गापासून 21 फुटांचे अंतर ठेवून गॅस वाहिनी नेली पाहिजे. मात्र, महामार्गाच्या सेवारस्त्याला अगदी खेटूनच सध्या काम सुरू आहे. भविष्यात गॅसगळती अथवा तुटफुटीमुळे महामार्ग बंद ठेवून सुरक्षितेचा प्रश्न निर्माण होत आहे.
टोरेंट कंपनी-ठेकेदाराचा मोठा ‘जॅक’
महामार्गावरील गस्तीच्या पथकाने सेवारस्त्याचे नुकसान होतेय तसेच आगामी काळात याच जागेतून सेवा रस्त्याची गटारे आणि इतर कामे होणार आहेत. त्यांना अडथळा होईल, असे सांगत गॅसवाहिनी ठेकेदारांस व कर्मचाऱ्यांस काम थांबवण्यास सांगितले. मात्र, त्यांना न जुमानता काम सुरूच ठेवल्याने त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून हा प्रकार कळविला आहे. महामार्ग प्राधिकरण अधिकारी हे पत्र मिळूनही इतके दिवस गप्पा का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. टोरेंट कंपनी आणि ठेकेदाराचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात मोठा ‘जॅक’ असल्याचे दिसते.