

राहू: दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गावांना शुक्रवारी (दि. 3) सायंकाळी झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने झोडपून काढले. बोरीभडक, बोरीऐंदी, सहजपूर, ताम्हाणवाडी, नांदूर आणि जावजी बुवाचीवाडी या परिसरांत विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
गेल्या काही दिवसांपासून परिसरात उन्हाचा तडाखा वाढला होता; मात्र अचानक बदललेल्या हवामानामुळे पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळीचा सर्वाधिक फटका काढणीला आलेल्या गहू आणि कांदा पिकाला बसला आहे. अनेक ठिकाणी कांदा काढून शेतातच साठवून ठेवला होता, तो पावसात भिजल्याने सडण्याची भीती निर्माण झाली आहे.
काढणीला आलेला गहू वादळी वाऱ्यामुळे जमिनीवर आडवा झाला असून, दाणे काळे पडण्याची शक्यता आहे. ऐन बहारात असलेल्या डाळिंबाच्या बागांनाही या पावसाचा मोठा फटका बसला असून, फळगळ सुरू झाली असून अनेक ठिकाणी झाडेही कोसळली आहेत. कोबी, फ्लॉवर आणि पालेभाज्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
वर्षभर कष्ट करून पीक हातात येण्याची वेळ आली असतानाच निसर्गाने घात केला, अशी भावना बोरीभडक परिसरातील शेतकरी समीर व नंदकुमार खेडेकर यांनी व्यक्त केली आहे. आधीच बाजारभावाचा प्रश्न असताना आता निसर्गाच्या कोपामुळे खर्च निघणेही कठीण झाले आहे.
पश्चिम पट्ट्यातील या नुकसानीची दाहकता मोठी असल्याने कृषी विभाग आणि महसूल विभागाने तत्काळ या भागाची पाहणी करावी, अशी मागणी पंचायत समितीचे माजी उपसभापती सुशांत दरेकर यांनी केली आहे. नुकसानग््रास्त भागाचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी सहजपूर आणि परिसरातील ग््राामस्थांनी केली आहे.