पुणे: पुण्याची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उभारण्यात येणारे तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्प हे केवळ शहराच्या वेशीपर्यंत न जोडता मेट्रोमार्गिकेपर्यंत जोडावेत, तरच वाहतूक कोंडी कमी होईल, अशी मागणी पुणे आणि जिल्ह्यातील आमदारांनी बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे केली.
पुणे आणि परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत उभारण्यात येणाऱ्या तीन महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन येत्या १८ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बुधवारी नियोजन बैठकीत आढावा घेत संबंधित यंत्रणांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या.
बैठकीला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, महापौर मंजूषा नागपुरे, आमदार राहुल कुल, सुनील कांबळे, शरद सोनवणे, ज्ञानेश्वर कटके, योगेश टिळेकर, चेतन तुपे, बापूसाहेब पठारे, हेमंत रासने, सुनील शेळके, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभाग नोंदविला. बैठकीत महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे मुख्य अभियंता रणजित हांडे यांनी तीनही प्रकल्पांचे सादरीकरण केले.
यावेळी आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सुनील टिंगरे, यांनी महत्त्वाकांक्षी प्रकल्प शहरापर्यंत आणून जोडावेत. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल आणि नागरिकांना त्याचा फायदा होईल. केवळ मांजरी, वाघोलीच्या वेशीलगतपासून रस्ते करण्यात येऊ नयेत. भविष्याचे नियोजन करून हे रस्ते मेट्रोमार्गापासून करावेत, अशी मागणी केली. गणेश कला क्रीडा मंच येथे दुपारी १.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात पुणे–शिरूर द्रुतगती महामार्ग, हडपसर–यवत उन्नत मार्ग आणि तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्ग या तीन महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन होणार आहे.
बैठकीत मंत्री भोसले म्हणाले की, पुणे परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन हे प्रकल्प हाती घेण्यात आले असून, त्यांची प्रभावी आणि वेळेत अंमलबजावणी केली जाईल. हडपसर–यवत प्रकल्प महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ आणि मेट्रो प्रशासनाच्या समन्वयातून राबविण्यात येणार असून, वाहतूक व्यवस्थापनासाठी पुणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांची स्वतंत्र बैठक घेतली जाणार आहे. सर्व प्रकल्पांची कामे चार वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रकल्पांच्या अंमलबजावणीदरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना आणि अपेक्षांचा योग्य विचार केला जाईल, असे सांगितले. खासदार सुप्रिया सुळे यांनी पालखीमार्गावरील रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याची सूचना केली, तर खासदार अमोल कोल्हे यांनी पुणे–शिरूर मार्गासाठी सर्वसमावेशक वाहतूक आराखडा तयार करण्याची गरज व्यक्त केली.