पुणे: संततधार पावसामुळे पुण्यातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, शहरातील प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पावसाच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी डांबराचा थर वाहून गेल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक असतानाच महापालिकेकडे डांबरच उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पावसाळ्यात खड्डे बुजविण्यासाठी वापरले जाणारे 'कोल्ड मिक्स'ही संपल्याने महापालिकेवर थेट कोचीवरून डांबर मागविण्याची वेळ आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले. या पाण्याच्या प्रवाहामुळे डांबरी रस्त्यांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. प्रमुख चौक, उड्डाणपुलांचे उतार तसेच अंतर्गत रस्त्यांवरही हीच परिस्थिती असल्याने वाहनचालक आणि दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत आहे. अपघातांचा धोकाही वाढला आहे. साधारणपणे पावसाळ्यात खड्डे बुजविण्यासाठी महापालिका कोल्ड मिक्सचा वापर करते. मात्र, यंदा त्याचाही तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, खड्डे बुजविण्याचे काम मंदावले असून, नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. शहरातील विविध क्षेत्रीय कार्यालयांकडून खड्ड्यांच्या दुरुस्तीची मागणी होत असली तरी डांबर उपलब्ध नसल्याने कामे रखडली आहेत.
दरम्यान, महापालिकेने कोची येथून डांबर मागविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. डांबराचा पुरवठा झाल्यानंतर शहरातील खड्डे बुजविण्याचे काम वेगाने हाती घेतले जाणार आहे. दुसरीकडे, येरवडा येथील डांबरनिर्मिती प्रकल्पाच्या चाचणीवरही डांबराअभावी परिणाम झाला असून, हा प्रकल्प अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकलेला नाही. त्यामुळे रस्ते दुरुस्तीच्या कामांवरही त्याचा परिणाम होत आहे. डांबर उपलब्ध होईपर्यंत नागरिकांना खड्डेमय रस्त्यांवरूनच प्रवास करावा लागणार असल्याचे चित्र आहे.
क्रूड ऑईलटंचाईमुळे डांबर मिळेना; येरवडा प्लँट बंद
पुण्यात मुसळधार पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. मात्र, खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेकडे डांबरच शिल्लक नाही. पावसाळ्यात वापरले जाणारे कोल्ड मिक्स देखील उपलब्ध नसल्याने पालिकेला आता कोचीवरून डांबर आयात करावे लागणार आहे, तोपर्यंत पुणेकरांना खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागणार आहे. येरवडा येथील डांबर प्रकल्पाचे नूतनीकरण महापालिकेने हाती घेतले आहे. हा प्रकल्प आधुनिक करून कार्बन उत्सर्जन कमी केले जाणार आहे. हा प्रकल्प जवळपास तयार झाला आहे. या प्रकल्पाची चाचणी करण्यासाठी डांबर नसल्याने हा प्रकल्प देखील रखडला आहे.
शहरात डांबरटंचाई असल्याने दुरुस्तीची कामे रखडली आहेत. ही कामे करण्यासाठी आम्ही कोचीवरून डांबर आणणार आहोत. लवकरच सर्व कामे सुरळीत होतील.ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका