पुणे: महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमधील १५५ कलमाच्या गैरवापर प्रकरणातील पुणे महसूल विभागामधील ४० अधिकाऱ्यांची विभागाबाहेर बदली करण्यात येणार आहे. पुन्हा या अधिकाऱ्यांना महसूल विभागात नियुक्त केले जाणार नसल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
हस्तलिखित सातबारा उताऱ्यातील दोष दुरुस्ती करण्यासाठी महसूल अधिनियमाच्या १५५ कलमाचा गैरवापर केल्याच्या तक्रारी आल्यानंतर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील तहसीलदार, प्रांताधिकारी यांचे मागील पाच वर्षांमधील आदेश तपासण्यात आले.
ज्या अधिकाऱ्यांनी गंभीर चुका केल्या आहेत, अधिकारांचा गैरवापर केला आहे, अशा १५ महसूल अधिकाऱ्यांवर यापूर्वीच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आता मंडल अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी आदी ४० अधिकाऱ्यांवर बदलीची कारवाई केली जाणार असल्याचे महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. लवकरच याबाबतचे आदेश जारी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महसूलचे राज्यात पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती, असे एकूण सहा विभाग आहे. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांनी ते नियुक्तीला असताना ज्या विभागात हे उद्योग केले आहेत. त्या विभागात त्यांना पुन्हा नियुक्ती मिळणार नसल्याचे महसूलमंत्री यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अशा महसूल अधिकाऱ्यांची आता थेट विभागाबाहेर बदली होणार आहे.
काय आहे प्रकरण
महसूल संहितेमधील १५५ कलमाचा वापर केवळ शुद्धलेखनाच्या किंवा लिपिकीय चुका दुरुस्त करण्यासाठी करणे अपेक्षित असते. मात्र, अधिकाऱ्यांनी याचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर जमिनींच्या मालकी हक्कात फेरफार केले. एकाची प्रॉपर्टी दुसऱ्याच्या नावावर करण्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. काही प्रकरणांमध्ये तर पुरावे नष्ट करण्यासाठी संचिका (फायली) गायब करण्यात आल्या आहेत.