पुणे: महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाने मोठा गाजावाजा करत सुरू केलेल्या ‘रंगयात्रा’ ॲपला अतिशय थंड प्रतिसाद मिळत असून, मे ते ऑगस्ट या चार महिन्यांसाठी एकाही नाट्यसंस्थेने किंवा सांस्कृतिक संस्थेने त्यावर अर्ज दाखल केलेला नाही. परिणामी, पुन्हा जुन्याच पद्धतीने तारखांचे वाटप करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. ‘रंगयात्रा’वर अर्ज दाखल न होण्याच्या या प्रकारामागे रंगमंचांच्या तारखांवर वर्षानुवर्षे हक्क सांगणाऱ्या काही मंडळींचा ‘अदृश्य दबाव’ असल्याची जोरदार चर्चा आहे. ‘रंगयात्रा’ या ऑनलाईन प्रणालीमुळे तारखांच्या या ‘फिक्स’ वाटपाला आळा बसेल, याचीच भीती काहींना वाटत होती. त्यामुळे त्यांनी सुरुवातीपासूनच या ॲपच्या विरोधी भूमिका घेतली.
एवढेच नव्हे, तर त्यासाठी राजकीय दबावही आणला होता, असेही सांगण्यात येते. आता तर हे ॲपच महापालिकेने बंद करावे, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेच्या 16 नाट्यगृहे आणि सांस्कृतिक केंद्रांच्या तारखांचे वाटप चौमाही पद्धतीने केले जाते. सर्वसामान्य नागरिकांनाही ही नाट्यगृहे सहज उपलब्ध व्हावीत, यासाठी महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ‘रंगयात्रा’ हे ॲप सुरू केले. सुरुवातीला त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
नंतर मात्र या ॲपद्वारे कोणीही अर्ज करत असल्याने चांगल्या नाट्य प्रयोगांना तारखा मिळणार नाहीत, हे कारण पुढे करत अनेक नाट्य व्यवस्थापक आणि निर्मात्यांनी त्याला विरोध करण्यास सुरुवात केली. पण, तरीही ॲपद्वारे ऑनलाइन अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू होती. प्रशासनाने मे ते ऑगस्ट या चार महिन्यांच्या तारखांच्या बुकिंगसाठी ऑनलाइन अर्ज मागविल्याचा दावा केला आहे. पण, त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. यंदा आलेले 700 हून अधिक अर्ज ऑफलाइन पद्धतीनेच दाखल झाले. त्यामुळे पूर्वीच्या पद्धतीनेच तारखांचे वाटप सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या नाट्यगृह विभागाचे मुख्य व्यवस्थापक राजेश कामठे यांनी दै. ‘पुढारी’च्या प्रतिनिधीला दिली.
मोजक्या नाट्यगृहांची मक्तेदारी?
बालगंधर्व रंगमंदिर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह (बिबवेवाडी), विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह (हडपसर) आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (कोथरूड) या प्रमुख नाट्यगृहांनाच सर्वाधिक मागणी असते. गेल्या काही वर्षांत प्रत्यक्ष अर्ज पद्धतीमुळे या नाट्यगृहांच्या तारखा काही तथाकथित मान्यवरांच्या मर्जीवरच मिळत असत. त्यामुळे अनेकांनी त्याविरुद्ध आवाज उठविल्यानेच रंगयात्रा ॲप अस्तित्वात आले. मात्र, आता तेही संबंधितांनी बंद पाडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
प्रशासनाने भूमिका घ्यावी
रंगयात्रा ॲपची प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शी असतानाही त्याला विरोध का? असा सवाल काही संयोजक संस्थांनी उपस्थित केला आहे. महापालिकेने आता तरी याबाबत कडक भूमिका घेण्याची गरज आहे. ऑनलाइन बुकिंग केल्यावरच प्रयोग होईल, असा पवित्रा प्रशासनाने घ्यावा, अशी मागणी रसिकांकडून होत आहे. असे न केल्यास ‘रंगयात्रा’ हे ॲप केवळ पालिकेचे स्वप्न ठरेल आणि पारदर्शकतेच्या नावाखाली पुन्हा मक्तेदारांच्या हातात सर्व सूत्रे जातील, असे काहींचे म्हणणे आहे.
मे ते ऑगस्ट या चार महिन्यांकरिता आम्ही ऑनलाइन अर्जाचे आवाहन केले होते. रंगयात्रा ॲपद्वारे अर्ज स्वीकारले जाणार होते. मात्र, त्यावर एकही अर्ज आलेला नाही. आलेले 700 अर्ज ऑफलाईन पद्धतीनेच दाखल झाले आहेत. त्यामुळे त्याआधारे तारखांचे वाटप करण्यात येत आहे. ॲप सुरू राहावे, असाच आमचा प्रयत्न आहे. ती सुलभ आणि पारदर्शक पद्धती आहे.राजेश कामठे, मुख्य व्यवस्थापक, महापालिका नाट्यगृह विभाग