पुणे: गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. ठिकठिकाणी गटार तुंबल्याने रस्त्यांवर पाणी साचले आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला.
या परिस्थितीत काही ठिकाणी नगरसेवक स्वतः रस्त्यावर उतरून गटार साफ करीत असल्याचे चित्र समोर आले. या पार्श्वभूमीवर उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी प्रशासनावर जोरदार टीका करीत अधिकारी नेमके कुठे होते? असा सवाल करीत प्रशासनाच्या तयारीवर टीका केली.
‘नगरसेवकच गटार साफ करीत असतील, तर अधिकारी कुठे होते?’ असा थेट सवाल वाडेकर यांनी उपस्थित करीत प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या नालेसफाई आणि पाणी निचऱ्याच्या कामांबाबत प्रशासनाने केलेल्या तयारीवर त्यांनी तीव नाराजी व्यक्त केली. दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होऊनही पहिल्याच पावसात शहरात पाणी साचण्याची समस्या कायम असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रशासनावर टीका करणारा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. यासोबतच पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या कामांचा तपशील देणारी ‘श्वेतपत्रिका’ जाहीर करण्याची मागणीही वाडेकर यांनी केली. कोणत्या भागात किती कामे झाली, त्यासाठी किती निधी खर्च झाला आणि त्याचा प्रत्यक्ष परिणाम काय झाला, याची सविस्तर माहिती नागरिकांसमोर मांडावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करीत होते. पावसाचा अंदाज लक्षात घेऊन तातडीने कर्मचाऱ्यांना फिल्डवर पाठविण्यात आले होते. शहरातील 58 ठिकाणी साचलेले पाणी अवघ्या 10 मिनिटांत निचरा करण्यात आला. ज्या ठिकाणी पाणी साचले होते, तेथे कर्मचारी थांबून परिस्थिती नियंत्रणात आणत होते. अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे हेही रात्री 3 वाजेपर्यंत प्रत्यक्ष काम पाहत होते.नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका