पुणे: पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर आल्याने जिल्हा प्रशासनाने पाणी वापराबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीत सर्व यंत्रणांना उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करण्याचे निर्देश दिले. तसेच, ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यावर भर देण्यास सांगितले.
जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करून पिण्याच्या पाण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, नगर परिषदा, ग्रामपंचायती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि इतर पाणी वापर करणाऱ्या संस्थांना वापराचे पुनर्नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. औद्योगिक आणि गैर-आवश्यक वापरात बचत करण्यावरही भर दिला.
पाणी चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
धरणे, कालवे, नद्या आणि अन्य जलस्रोतांमधून होणारा अनधिकृत पाणीउपसा रोखण्यासाठी महसूल, पोलिस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकांमार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत मोटारी, पंप, पाइपलाइन आणि इतर साधनांद्वारे पाणी चोरी करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.