पुणे : पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थी संघटना, राजकीय पक्ष यांच्यात झालेल्या वादांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने विद्यापीठाने पोलिस आयुक्त, कुलगुरूंच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 18) विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांच्या संघटनांसोबत चर्चा करण्यात येणार आहे.
विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी ही माहिती दिली. विद्यापीठात काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या दोन संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. याप्रकरणी संघटनांकडून तक्रारी दाखल केल्यानंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल झाला होता. विद्यापीठाच्या वसतिगृहातील भिंतीवर पंतप्रधानांविषयी वादग्रस्त मजकूर लिहिल्याची तक्रार अभाविपने केली.
भाजपने निषेध मोर्चा काढल्यानंतर कार्यकर्ते आणि अन्य एका संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली होती. त्यामुळे विद्यापीठात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी 7 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत विद्यापीठात जमावबंदी लागू केली आहे.
विद्यापीठ आवारात शैक्षणिक पावित्र्य राखणे, सलोख्याचे वातावरण जपणे ही सर्व घटकांची सामूहिक जबाबदारी आहे. विद्यापीठाशी संबंधित सर्व विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांच्या संघटनांसोबत चर्चा करून सर्वंकष उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
त्यासाठी शनिवारी सकाळी अकरा वाजता विद्यापीठाच्या मुख्य इमारतीतील ज्ञानेश्वर सभागृहात विद्यार्थी प्रतिनिधींची कुलगुरू, पोलिस आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. संघटनेच्या कमाल तीन ते पाच प्रतिनिधींना बैठकीस उपस्थित राहता येणार आहे.
हेही वाचा