पुणे : शहरात गल्ली-बोळांसह जेथे कचर्याचे ढिगारे साचले आहेत तेथे दररोज कचरा मोठ्या प्रमाणावर जाळला जात आहे. वायूप्रदूषणात हे प्रदूषण मोठी भर घालत असून, गेल्या पाच वर्षांत शहरातील वायुप्रदूषणात तब्बल 60 टक्क्यांनी वाढ झाल्याचा अहवाल शहरातील आयआयटीएमसह पर्यावरण शिक्षण केंद्र दिल्ली, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ,गांधीनगर आणि नैसर्गिक संसाधन संरक्षण परिषदेने दिला आहे.
गेल्या पाच वर्षांत शहरातील हवेची गुणवत्ता लक्षणीयरीत्या खालावली आहे. पाच वर्षांच्या अभ्यासानुसार शहरातील प्रदूषणाचे दिवस 74 वरून 94 ते 100 पर्यंत वाढले आहेत. पीएम-10 व पीएम-2.5 या सूक्ष्म व अतिसूक्ष्म धुलिकणांसह सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइडने मर्यादा ओलांडली आहे. देशातील 122 शहरे प्रदूषित आहेत. त्यात दिल्ली, पुणे, मुंबई, अहमदाबाद या चार महानगरांत ते अत्यंत वेगाने वाढत आहे. कारण, इथे इतर घटकांसह वाहन प्रदूषण सर्वाधिक आहे. त्यामुळे पुणे शहराच्या प्रदूषणाकडे देशाचे लक्ष आहे.
कचरा जाळल्याने विषारी रसायने हवेत एकत्र येतात. ज्यामुळे दीर्घकालीन आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. या रसायनांमध्ये नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड,अस्थिर सेंद्रिय रसायने, पॉलीसायक्लिक सेंद्रिय पदार्थ यांचा समावेश आहे. लाकूड जाळल्यानेदेखील ही विषारी रसायने बाहेर पडू शकतात. जाळण्यात येणार्या घनकचर्यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिक, रबर, पॉलिइथिलीन यांचा समावेश जास्त प्रमाणात असतो. हे पदार्थ जाळल्याने उत्सर्जित होणारे सूक्ष्म कण फुफ्फुसात प्रवेश करतात. पुढे रक्तप्रवाहात प्रवेश करतात. त्यामुळे हृदयविकार, फुफ्फुसाचा कर्करोग, दमा हे आजार उद्भवू शकतात.
शहरात सध्या एकूण 15 एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन आहेत. यात सफर संस्थेची दहा, तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाच मॉनिटरिंग स्टेशन चालवली जातात. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे स्वतंत्र नेटवर्क आहे. त्यांची सुमारे 50 पर्यावरण निरीक्षण केंद्रे आहेत. यात वायुप्रदूषण, तापमान, आर्द्रता, आवाज आणि विकिरण पातळी मोजली जाते. मात्र, यात सफर व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अंदाज अधिक अचूक आहेत. जमिनीपासून तीन मीटर उंचीवरील हवेची गुणवत्ता इथे सतत मोजली जाते. त्याचा अहवाल दर मिनिटाला स्मार्टफोनवरही दिसतो. डॉ. किम नॉल्टन (एनआरडीसी),डॉ. गुफरान बेग (आयआयटीएम पुणे), डॉ. दिलीप मावळंकर, संस्कृती मेनन, डॉ. श्याम पिंगळे, डॉ. डेव्हिड गोल्डस्टीन (एनआरडीसी), डॉ. सरथ गुट्टीकुंडा (शहरी उत्सर्जन), डॉ. अभियंत तिवारी, डॉ. सुवर्णा टिकले (आयआयटीएम), डॉ. प्रिया दत्ता, आणि अमर करण या शास्त्रज्ञांचे हवा शुध्दीकरणातील यंत्रणा उभारण्यात मोठे योगदान आहे.
कचरा जाळल्याने श्वसनाच्या विकारांचा खूप त्रास होतो. त्यामुळे वर्षभर रुग्ण येतच असतात. पण यंदा दिवाळीपासून श्वसनविकारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांना जास्त त्रास होतो. त्यांचा खोकला काही केल्या थांबत नाही. त्यामुळे त्यांना प्रदीर्घकाळाची ट्रीटमेन्ट घ्यावी लागत आहे. न्युमोनियाचा आजार त्यांना जास्त प्रमाणात ग्रासतो आहे. माझ्या रुग्णालयात 5 नेबुलायजर आहेत; तेही कमी पडत आहेत. इतके या आजाराचे रुग्ण दिवाळीनंतर वाढले आहेत. फटाके,
कच-याचा धूर, वाहन प्रदूषण आणि बांधकामांची धूळ असे सर्व एकत्र झाल्याने ज्येष्ठ नागरिकांचे निदान कठीण झाले आहे.– डॉ. संजय राजकुंटवार, फॅमिली फिजिशियन, अरण्येश्वर
हेही वाचा