पुणे: महापालिकेच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील 169 पदांसाठी होणारी भरती परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. 22, 23 आणि 29 एप्रिल रोजी राज्यातील सात ठिकाणी ही परीक्षा होणार असली, तरी परीक्षा केंद्रांच्या वाटपावरून उमेदवारांमध्ये तीव नाराजी पसरली आहे. याआधी दोन वेळा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने आधीच अस्वस्थ असलेल्या उमेदवारांमध्ये आता प्रशासनाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त होत आहे.
उमेदवारांच्या म्हणण्यानुसार, पुण्यातील अनेक विद्यार्थ्यांना नागपूर आणि नांदेडसारख्या दूरच्या शहरांमध्ये परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत. तसेच, नाशिक, संभाजीनगर, कोल्हापूर आणि मुंबई येथेही केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. मात्र, दूरवरच्या केंद्रांमुळे प्रवासाचे नियोजन करणे कठीण ठरत असून, रेल्वे व बसचे आरक्षण मिळवणेही आव्हानात्मक झाले आहे.
परिणामी, अनेकांना दोन दिवस आधीच प्रवास करावा लागत असून, त्यांचा खर्च लक्षणीय वाढत आहे. नागपूर व नांदेडमध्ये सध्या तीव उष्णतेची लाट असल्याने आरोग्याच्या दृष्टीनेही उमेदवारांनी चिंता व्यक्त केली आहे. परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असताना ती ऑनलाइन किंवा स्थानिक पातळीवर घेता आली असती, असे मतही विद्यार्थ्यांकडून व्यक्त केले जात आहे. दूरवर केंद्र देणे म्हणजे उमेदवारांना नाहक त्रास देण्यासारखे असल्याची प्रतिक्रिया काहींनी नोंदवली आहे. आधीच दोनदा परीक्षा पुढे ढकलल्यानंतर या निर्णयामुळे उमेदवारांमधील असंतोष आणखी वाढला आहे.
...तर जवळच्या परीक्षा केंद्राचा पर्याय का नाही वापरला
प्रशासनाच्या मते पुण्यातील परीक्षा केंद्रांची क्षमता सुमारे 8 हजार उमेदवारांपर्यंत मर्यादित आहे, तर एकूण अर्जदारांची संख्या 23 हजारांच्या आसपास आहे. ‘जर क्षमता कमी असेल तर सोलापूर, नाशिकसारख्या जवळच्या शहरांमध्ये केंद्रे देण्याचा पर्याय का वापरला नाही?’ असा सवाल उमेदवारांनी उपस्थित केला आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांच्या वाटपाचा निर्णय पुन्हा विचारात घ्यावा, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे.
पुण्यात असलेल्या सेंटरची क्षमता ही केवळ आठ हजार विद्यार्थ्यांची आहे. मात्र, तब्बल 23 हजार मुलांनी पुणे सेंटर निवडले होते. टाटाची सेंटर राज्यात केवळ सात ठिकाणी आहे, याची कल्पना देखील मुलांना देण्यात आली होती. शक्यतोवर आम्ही मुलांना जवळची सेंटर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रत्येकाला ते देणे शक्य नसल्याने काही मोजक्या विद्यार्थ्यांना लांबची सेंटर द्यावी लागली.विजयकुमार थोरात, प्रशासकीय अधिकारी, महापालिका