पुणे

Ajit Pawar : "मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेली सूचना गांभीर्याने घेतली" : अजित पवारांचे प्रत्युत्तर

पुणे शहरासाठी आलेल्या विकास निधीपैकी केवळ ५५ टक्के निधीच खर्च झाला

पुढारी वृत्तसेवा

मागील ९ वर्षे पुणे शहराच्या विकासासाठी राज्य सरकारने कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र, स्थानिक नेतृत्वाच्या अपयशामुळे हा निधी खर्च होऊ शकला नाही

Ajit Pawar press conference

पुणे : "मी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेबाबत बोललो. मी महापालिकेतील अंमलबजावणीवर बोललो आहे. महायुती सरकारबाबत बोललो नाही. आम्ही राज्यात आणि केंद्रात एकत्र आहोत. पुण्यात आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवत आहोत. मी केलेल्या विधानावर बोलण्याचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना अधिकार आहे, असे स्पष्ट करत आम्हाला हलक्यात घेऊन नका, अशी चंद्रकांत पाटील यांनी केलेली सूचना मी गांभीर्याने घेतली आहे," अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज (दि. ३) पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.

मी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेबाबत बोललो

महानगरपालिका निवडणुकीत स्वतंत्र लढणाऱ्या महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी थेट अजित पवारांना बरोबर घेऊ नका, असा सल्ला फडणवीसांना दिला होता, असे विधान केले तर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत बोलताना, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आमचे आहेत, इशारा देणाऱ्यांनी आम्हाला हलक्यात घेऊ नये, असा इशारा दिला होता. यावर आज पत्रकार परिषदेत अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, मी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेबाबत बोललो. मी महापालिकेतील अंमलबजावणीवर बोललो आहे. रवींद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केलेली सूचना मी गांभीर्याने घेतली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

पुण्यासाठी निधी आला, पण खर्चच झाला नाही

मागील ९ वर्षे पुणे शहराच्या विकासासाठी राज्य सरकारने कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र, स्थानिक नेतृत्वाच्या अपयशामुळे हा निधी खर्च होऊ शकला नाही," अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील भाजपच्या स्थानिक नेत्यांवर आणि कारभाऱ्यांवर नाव न घेता निशाणा साधला. पुणे महानगरपालिकेतील प्रशासकीय दिरंगाई आणि नियोजनाच्या अभावामुळे पुणेकरांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत असल्याची टीकाही त्यांनी केली.

विकासकामांत स्थानिक नेतृत्व अपयशी

पुण्यातील विकासकामांचा आढावा घेताना अजित पवार म्हणाले की, मागील काही वर्षांमध्ये राज्य सरकारने पुणे महानगरपालिकेला भरीव निधी दिला होता. मात्र, हा निधी विकासावर खर्च करण्यात स्थानिक कारभारी अपयशी ठरले आहेत. एकूण ११३० कोटी रुपये निधी होता. मात्र केवळ ८५८ कोटी रुपये खर्च झाले आहेत. याचा अर्थ केवळ निधी केवळ ५५ टक्केच खर्च झाला आहे, यात प्रशासन आणि स्थानिक कारभारी लोक कमी पडले. त्यांच्या या नियोजनशून्य कारभारामुळेच पुणेकरांना आजही खराब रस्ते आणि खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे."

पुण्‍यातील २४ तास पाणी योजनेचे काय झाले?

पुणेकरांना २४ तास पाणी देण्याची फक्त आश्वासन देण्यात आली, मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नाही. पुण्यातील काही उपनगरांमध्ये पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. मी स्वतः आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहोत," असेही त्यांनी सांगितले.

वाहतूक आणि कचरा प्रश्नावर तोडगा काढणार

पुणे शहराची ओळख आता वाहतूक कोंडीचे शहर अशी होऊ लागली आहे. जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या शहरांमध्ये पुणे शहर चौथ्या क्रमांकावर आहे. पुण्यातील वाहतूक समस्येवर तोडगा काढणे हे आमचे प्रथम प्राधान्य आहे. पुणे शहरातील वाहतूक, रस्ता, कचरा, एसटीपी प्रकल्प आणि पाणीपुरवठा समस्यांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे. आता यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मी पिंपरी-चिंचवड, बारामती शहर विकसित करून दाखवले आहे. आता पुणेकरांनी पुन्हा एकदा माझ्याकडे शहराची सूत्रे द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT