पुणे : भूमिगत मेट्रोमार्गांच्या सुरक्षेला थेट धोका निर्माण करणाऱ्या अलीकडील घटनेनंतर पुणे महापालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. मेट्रो बोगद्यांच्या वर आणि आसपास होणाऱ्या सर्व बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र व सविस्तर नियमावली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या नियमांद्वारे बोगद्यांवर होणारा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन प्रत्येक बांधकामावर बारकाईने नजर ठेवली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.
शहरातील पेठ भागांमध्ये मेट्रो मार्ग भूमिगत असून, या परिसरात मोठ्या प्रमाणावर जुन्या वाड्यांचा पुनर्विकास तसेच नव्या इमारतींची कामे सुरू आहेत. यामुळे मेट्रो बोगद्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात होती. दरम्यान, शुक्रवार पेठ परिसरात खडक पोलिस ठाण्यासमोर एका वाड्याच्या बांधकामादरम्यान बोअरवेल खोदकाम करताना मेट्रोच्या बोगद्याला भगदाड पडल्याची घटना घडली. स्वारगेट ते शिवाजीनगर या मार्गावरील बोगद्यात पाण्याची गळती झाल्याचे लक्षात येताच मेट्रो प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करीत संबंधित घरमालक आणि ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल केला.
या घटनेनंतर महापालिका आणि मेट्रो प्रशासन अधिक सतर्क झाले असून, भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पेठ भागांमध्ये प्रलंबित असलेले अनेक पुनर्विकास प्रकल्प आणि सुरू असलेली बांधकामे लक्षात घेता, मेट्रो बोगद्यांवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नव्या नियमावलीनुसार, मेट्रो बोगद्यांच्या वर किंवा परिसरात होणाऱ्या प्रत्येक बांधकामासाठी स्वतंत्र तांत्रिक परवानग्या घेणे अनिवार्य करण्यात येणार आहे. विशेषतः बोरवेल खोदकामासाठी भूजल विभागाची स्वतंत्र मंजुरी आवश्यक असेल. आतापर्यंत एकाच बांधकाम परवानगीच्या आधारे बोअरवेल खोदकाम केल्याचे प्रकार समोर आले होते; मात्र आता प्रत्येक टप्प्यासाठी स्वतंत्र परवानगी घेणे बंधनकारक असेल. या नियमावलीत सुरक्षित अंतर, कंपण नियंत्रण, बांधकामाच्या तांत्रिक अटी आणि मेट्रो संरचनेवर होणाऱ्या परिणामांचा सविस्तर विचार केला जाणार आहे. मेट्रो प्रकल्पाची सुरक्षितता अबाधित ठेवत नागरिकांच्या पुनर्विकासाच्या गरजांनाही न्याय देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे.
शुक्रवार पेठेत घडलेली घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. भविष्यात मेट्रो प्रकल्पाला कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी लवकरच कठोर नियमावली जाहीर केली जाईल, असे आयुक्त राम यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे पेठ भागांतील बांधकामांना शिस्त येण्याची अपेक्षा असली, तरी बांधकाम व्यावसायिक आणि नागरिकांसाठी नव्या नियमांचे पालन करणे आव्हानात्मक ठरणार आहे.