पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या लेखी परीक्षेच्या निकालात पुणे जिल्ह्याने यंदाही बाजी मारली. पुणे जिल्ह्याचा सर्वाधिक 93.32 टक्के निकाल लागला. यानंतर अहिल्यानगर जिल्ह्याचा 90.32 टक्के, तर सोलापूर जिल्ह्याचा 87.22 टक्के निकाल लागला. पुणे विभागातील तिन्ही जिल्ह्यांचा एकत्रित निकाल 91.25 टक्के लागला. मागील वर्षीच्या तुलनेत पुणे विभागाच्या निकालात यंदा 0.62 टक्क्यांची घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष औदुंबर उकिरडे, सचिव डॉ. मीनाक्षी राऊत यांनी निकालाबाबतची माहिती दिली.
पुणे विभागातून 2 लाख 44,191 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या 2 लाख 41,826 विद्यार्थ्यांपैकी 2 लाख 20,680 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षी पुणे विभागाचा निकाल 91.88 टक्के लागला होता. यंदा राज्याचाच एकूण निकाल घटल्यामुळे विभागाच्या निकालातही 0.62 टक्क्यांनी घट झाली आहे. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या 7,644 पुनर्परीक्षार्थ्यांपैकी 7,471 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 5,779 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याची टक्केवारी 77.35 आहे.
जिल्हानिहाय निकालाचा आढावा घेतला असता पुणे जिल्ह्यातून 1 लाख 30,899 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात 67,304 मुले, 63,595 मुली होत्या. 66,761 मुले, 63,180 मुली अशा एकूण 1 लाख 21,941 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. उत्तीर्ण झालेल्या 1 लाख 21 हजार 263 विद्यार्थ्यांमध्ये 60 हजार 837 मुले, 60,426 मुलींचा समावेश आहे. मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 4.52 टक्के जास्त आहे. जिल्ह्यातील विज्ञान शाखेचे 98.14 टक्के, कला शाखेचे 83.37 टक्के, वाणिज्य शाखेचे 89.02 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
अहिल्यानगर जिल्ह्यातून 32,263 मुले, 27,302 मुली अशा एकूण 59,565 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. 31,924 मुले, 26,971 मुली अशा एकूण 58,895 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी 52,196 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात 27,694 मुले, 25,502 मुली असे एकूण 53 हजार 196 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 8.71 टक्क्यांनी जास्त आहे. जिल्ह्यातील विज्ञान शाखेचे 96.55 टक्के, कला शाखेचे 75.59 टक्के, वाणिज्य शाखेचे 85.26 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
सोलापूर जिल्ह्यातून 29,595 मुले, 24,132 मुली अशा एकूण 53,727 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षा दिलेल्या 52,990 विद्यार्थ्यांपैकी 29,165 मुले, 23,825 मुली होत्या. तर उत्तीर्ण झालेल्या 46 हजार 221 विद्यार्थ्यांमध्ये 23,978 मुले, 22,243 मुलींचा समावेश आहे. तर मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 11.14 टक्क्यांनी जास्त असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील विज्ञान शाखेचे 95.52 टक्के, कला शाखेचे 72.85 टक्के, वाणिज्य शाखेचे 83.66 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती पुणे विभागीय मंडळाने दिली.
विभागातील गुणवंत
विभागातील 981 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहेत. 85 ते 90 टक्के गुण मिळविलेले 3 हजार 186, 80 ते 85 टक्के गुण मिळविलेले 6 हजार 679, 75 ते 80 टक्के गुण मिळविलेले 10 हजार 899 विद्यार्थी आहेत.
शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल
शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेचा सर्वाधिक 98.14 टक्के इतका निकाल लागला आहे. वाणिज्य शाखेचा एकूण निकाल 89.02 टक्के इतका, तर कला शाखेचा एकूण निकाल 83.37 टक्के लागला आहे. त्यामुळे निकालात विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे.