पुणे: शहरात दिवसेंदिवस कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनत असून, अनेक भागांमध्ये सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याचे चित्र दिसत आहे. कचरा प्रक्रिया करणारे महत्त्वाचे प्रकल्प बंद किंवा अपूर्ण क्षमतेने सुरू असल्याने महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. विशेषतः केशवनगर येथील दोन प्रक्रिया प्रकल्प बंद पडले असून, रामटेकडी आणि सूस येथील प्रकल्पही अत्यल्प क्षमतेने सुरू असल्याने शहरात दररोज शेकडो टन अतिरिक्त कचऱ्याची भर पडत असल्याची कबुली प्रशासनाने दिली आहे.
सर्वसाधारण सभेनंतर महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांची माध्यम प्रतिनिधींनी भेट घेत कचरा समस्येबाबत विचारणा केली. यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, केशवनगर येथील साईराम आणि नेफा कंपनीचे प्रत्येकी सुमारे 150 टन क्षमतेचे प्रक्रिया प्रकल्प बंद आहेत. यामध्ये एका प्रकल्पात क्षमतावाढीचे काम सुरू असून, दुसरा प्रकल्प यांत्रिक बिघाडामुळे बंद ठेवण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात दररोज सुमारे 1100 टन ओला कचरा निर्माण होतो. त्यापैकी फक्त 400 टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असून, उर्वरित 700 टन कचरा शेतीसाठी दिला जात आहे. पूना बायो एनर्जी प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कचरा व्यवस्थापनावरून नगरसेवक आक्रमक
शहरात जागोजागी कचरा साचला असून, त्याची विल्हेवाट लावली जात नाही. काही ठिकाणी गेल्या चार दिवसांपासून कचरा उचलला गेला नाही, असा आरोप विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी करत प्रशासनाला धारेवर धरले, तर काँग््रेासने घनकचरा व्यवस्थापनाच्या सुमारे 500 कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेवरून शंका उपस्थित करत सत्ताधारी भाजपकडून एका विशिष्ट कंपनीला फायदा मिळावा, या उद्देशाने शहरातील कचरा उचलण्याच्या कामात जाणूनबुजून निष्काळजीपणा केला जात असल्याचा आरोप केला.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी पॉईंट ऑफ इन्फर्मेशनद्वारे कोथरूड परिसरात सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे सामाज्य पसरल्याकडे तर विरोधी पक्षनेते ॲड. नीलेश निकम, वासंती जाधव, दत्ता बहिरट, महेश वाबळे, योगेश मुळीक, सुरेखा कवडे, कोमल नवले, अश्विनी लांडगे यांनी देखील कचऱ्याच्या समस्येवर टीका करताना बंद असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
नगरसेवक अरविंद शिंदे आणि प्रशांत जगताप यांनी कचरामाफियांसाठी जाणीवपूर्वक कचरा साचविला जात आहे. एकाच कंपनीला काम देण्यासाठी सत्ताधारी आणि प्रशासनाचे प्रयत्न आहेत. त्यातूनच ही कचरा समस्या निर्माण केली जात असल्याचा आरोप केला. काँग््रेासचे गटनेते ॲड. रामचंद्र ऊर्फ चंदूशेठ कदम यांनी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. भूमी ग््राीन या कंपनीलाच घनकचरा व्यवस्थापनाची निविदा मिळावी, यासाठी शहरात कचऱ्याची समस्या मुद्दाम वाढवली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
सूसमधील प्रकल्प 200 टनऐवजी 40 टन क्षमतेने सुरू
रामटेकडी येथील 750 टन क्षमतेच्या मे. पूना बायो एनर्जी प्रकल्पात काही महिन्यांपूर्वीपर्यंत 200 टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात होती. मात्र, सध्या हा प्रकल्प केवळ 100 टन क्षमतेनेच सुरू आहे. दुसरीकडे सूस येथील नोबल कंपनीचा ओल्या कचऱ्यापासून इंधननिर्मिती करणारा 200 टन क्षमतेचा प्रकल्प केवळ 40 टन क्षमतेने सुरू असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले. या सर्व कारणांमुळे शहरात दररोज 300 ते 400 टन अतिरिक्त कचऱ्याची भर पडत आहे.
अलीकडच्या काळात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्याचा परिणाम काही प्रकल्पांमधील प्रक्रिया कामांवर होत आहे. बंद कचरा प्रक्रिया प्रकल्प लवकर सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असून, तोपर्यंत कार्यरत प्रकल्पांमध्ये अतिरिक्त कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन केले आहे. लवकरच शहरातील कचरा समस्या नियंत्रणात आणली जाईल.संतोष वारुळे, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग, पुणे महापालिका