पुणे: आखाडाच्या पार्श्वभूमीवर घरगुती ग्राहकांसह हॉटेल व्यावसायिकांकडून लिंबाला मागणी कायम आहे. त्यातुलनेत आवक कमी पडल्याने लिंबाच्या १५ किलोच्या गोणीमागे शंभर रुपयांनी वाढ झाली. रविवारी बाजारात लिंबाच्या गोणीला ३०० ते १००० रुपये भाव मिळाला. किरकोळ बाजारात आकारानुसार दहा रुपयांना दोन ते तीन नग अशी विक्री सुरू आहे.
पावसाच्या आगमनानंतर बाजारात कलिंगड, खरबुजाला घटलेली मागणी कायम आहे. मात्र, त्यातुलनेत आवक जास्त असल्याने त्यांच्या भावात किलोमागे पाच रुपयांची घसरण झाली आहे. उन्हाच्या तीव्र चटक्यामुळे फुलांची गळ होऊन उत्पादन घटल्याने फळबाजारात पपईची आवक कमीच आहे. त्यापेक्षा मागणी जास्त असल्याने पपईच्या भावात किलोमागे पाच रुपयांनी वाढ झाली आहे. उर्वरित सर्व फळांची आवक जावक कायम असल्याने गत आठवड्यातील दर टिकून आहेत.
फळबाजारात रविवारी (दि. ९) लिंबू १००० ते १२०० गोणी, मोसंबी ५० ते ६० टन, संत्रा २ टन, डाळींब १०० टन, पपई ५ ते ६ टेम्पो, कलिंगड २० ते २५ गाड्या, खरबूज ५ ते ६ टेम्पो, चिक्कू ५०० डाग, पेरु ४०० ते ५०० क्रेट, पिअर ५ गाड्या, सीताफळ १० ते १२ टन आणि अननसाची ५ ट्रक इतकी आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ३०० ते १०००, मोसंबी : (३ डझन) : १३०-२५० (४ डझन) : ३५-९०, संत्रा : (१० किलो) : १५०-१०००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ५०-१३०, आरक्ता : १०-४०, गणेश : ५-२०, कलिंगड : ५-७, खरबूज : १०-२०, पपई : १०-४०, चिक्कू (दहा किलो) : १००-६००, पेरू (२० किलो) : ३००-५००, अननस (१ डझन) : १००-६००, सीताफळ (१ किलो) : २०-१५०, पिअर (२४ ते २५ किलो) : ३५००-४०००.