पुणे: शांतता क्षेत्रात ध्वनिवर्धकाला पूर्णपणे मनाई असताना पुणे पोलिसांनी दिलेल्या 'चार बेस, चार टॉप'ची परवानगी हा न्यायालयाच्या आदेशाचा अवमान आहे. त्यामुळे नियमांची पायमल्ली होत आहे, असा आरोप लाउडस्पीकर विरोधी पुणेकर मंचातर्फे शुक्रवारी पत्रकार परिषदेत करण्यात आला.
दरम्यान, मंचाचे मुकुंद किर्दत, डॉ. राहुल सावंत, चिंतामणी कांगो, डॉ. सिमी आठवले, नीता केळकर, कीर्ती लिमये यांनी पोलिस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेवरही या वेळी प्रश्न उपस्थित केले. किर्दत म्हणाले, सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (एनजीटी) आदेशानुसार ध्वनिमर्यादेचे काटेकोर पालन आवश्यक आहे. पुणे शहरातील १२१ आणि पिंपरी-चिंचवडमधील ६५ शांतता क्षेत्रांमध्ये ध्वनिवर्धकाला परवानगी देता येणार नाही. शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि न्यायालयांच्या परिसरातील १०० मीटर क्षेत्राचा त्यात समावेश होतो.
असे असताना पुणे पोलिस आयुक्त 'चार बेस, चार टॉप'साठी गणेशोत्सवात परवानगी देते, ही हास्यास्पद बाब आहे. यामध्ये आवाजाची मर्यादा निश्चित केली असली, तरी ध्वनीची तीव्रता केवळ उपकरणाच्या वॅटेजवर ठरवता येत नाही. स्पीकरची रचना, ॲम्प्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी यांचाही त्यावर परिणाम होतो.
त्यामुळे अशा पद्धतीच्या मर्यादेला शास्त्रीय आधार नाही, असा दावाही त्यांनी या वेळी उपस्थित केला. मोठ्या आवाजामुळे श्रवणशक्तीवर परिणाम, डोकेदुखी, रक्तदाब वाढणे आणि मानसिक तणावासारख्या समस्या उद्भवू शकतात, असे डॉ. सावंत यांनी नमूद केले. तर, दहीहंडीच्या काळात ११६ ठिकाणी ध्वनिमर्यादा ओलांडल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, नागरिकांनी नोंदवलेल्या ६० ठिकाणांपैकी ३० ठिकाणी १०० डेसिबलपेक्षा अधिक आवाज आढळून आल्याचे मंचातील सदस्यांकडून सांगण्यात आले.
आज डीजे विरोधात मोर्चा
गणेशोत्सवात ध्वनिवर्धकांच्या वापरावरून पुण्यात मोर्चे, दावे, प्रतिदावे, वादविवाद निर्माण झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. १२ सप्टेंबर) सायंकाळी ५.३० वाजता कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून कर्वे रस्त्यावरील मृत्युंजयेश्वर मंदिरापर्यंत कर्णकर्कश आवाजाविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे, असेही सांगण्यात आले.