मुंबई : पुणे शहर आणि परिसरात गुरुवारी अतिवृष्टीमुळे सिंहगड रोड, संचयनी पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर, फुलपची वाडी आदी भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने चिखल आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या परिसरात राहात असलेल्या नागरिकांच्या घरांमधील चिखल, गाळ आणि कचरा युद्धपातळीवर दूर करावा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
महापालिका तसेच साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्याच्या मदतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहिम राबवावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. पुरामुळे घरांचे, शेतीचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
पुण्यातील ज्या भागात पुराचा फटका बसला, तेथे अस्वच्छेतमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, याची मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेत प्रशासनाला हे आदेश दिले आहेत. जिल्हा प्रशासनाला डीप क्लीन मोहिम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.
स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी सुमित इंटरप्राईजेस आणि बीव्हीजी या खासगी स्वच्छता कंपन्यांची मदत घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. सुमित कंपनी ५०० स्वच्छता कर्मचारी आणि बीव्हीजी कंपनी १०० सफाई कर्मचारी उपलब्ध करून दिले आहेत.
पुराचे पाणी, चिखल यामुळे परीसरात रोगराई पसरू नये यासाठी महापालिका प्रशासनाने औषधांची फवारणी करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.