Pune Municipal Corporation Pudhari
पुणे

Pune Flood Control Project Delay: पुण्यात पूरनियंत्रण प्रकल्प रखडला; 200 कोटींच्या कामांपैकी फक्त 8 ठिकाणी सुरुवात

निविदा-तांत्रिक प्रक्रियेत अडकले काम; पावसाळ्यापूर्वी पूरस्थितीचा धोका कायम

पुढारी वृत्तसेवा

निनाद देशमुख

पुणे: येत्या पावसाळ्यात शहर पूरमुक्त करण्यासाठी शासनाने शहरातील प्रमुख नाले व ओढ्यांवर सीमाभिंती बांधण्यासाठी 200 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर केला खरा, मात्र प्रत्यक्षात 88 पैकी अवघ्या आठ ठिकाणीच कामाला सुरुवात झाली आहे. निविदा प्रक्रिया, तांत्रिक छाननी आणि कागदपत्रे अशा कचाट्यात ही कामे अडकल्याने कामांना गती मिळताना दिसत नाही. परिणामी, यंदाही पावसाळ्यात पुणेकरांना ‌‘जलसंकटा‌’चा सामना करावा लागणार, अशी स्थिती आहे.

पावसाळा सुरू होण्यास काही महिने राहिले आहेत. त्यात गेल्या काही वर्षांत काही तासांत होणाऱ्या पावसात शहर तुंबण्याचे प्रमाण वाढले आहे. यातून पुणेकरांची सुटका करण्यासाठी आणि शहरातील पूरस्थिती नियंत्रणासाठी नाले व आंबिल ओढ्यावर सीमाभिंती उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकारने तीन वर्षांपूर्वी 200 कोटींचा निधी जाहीर केला.

गरजेनुसार पाच विधानसभा मतदारसंघनिहाय कामाच्या निविदा काढण्यात आल्या. मात्र, निधी न मिळाल्याने त्या रद्द कराव्या लागल्या. यानंतर 200 कोटींची एकत्रित निविदा काढण्यात आली. त्यानुसार या वर्षी जानेवारी महिन्यात कार्यादेश देण्यात आले. या अंतर्गत 88 ठिकाणी कामे होणार असली, तरी प्रत्यक्षात केवळ आठ ठिकाणीच कामे सुरू झाली आहेत.

निधी मिळूनही कामात ‌‘ढिलाई‌’

महापालिका क्षेत्रातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 30 जुलै 2024 रोजी राज्य सरकारने 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. 3,729 मीटरच्या सीमाभिंती बांधण्याचे नियोजन महापालिकेने केले. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासकीय मान्यता मिळाली, 15 डिसेंबर 2025 ला स्थायी समितीने ‌’टी अँड टी इन्फ्रा‌’ या कंपनीला 156 कोटींचे कंत्राटही दिले. 21 जानेवारी 2026 रोजी कार्यादेश (वर्क ऑर्डर) देऊन आता तीन महिने उलटले, तरीही कामाचा वेग ‌‘नगण्य‌’ आहे.

हप्तेवारीने निधी आणि तांत्रिक अडथळे

शासनाकडून 200 कोटींपैकी केवळ 46.10 कोटी रुपयेच महापालिकेला प्राप्त झाले आहेत. हा निधी पुरेसा नसल्याचे रडगाणे गात प्रशासन कामात टाळाटाळ करत आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे. वानवडी, विठ्ठलनगर, बिबवेवाडी आणि नऱ्हे यांसारख्या भागांत जेथे काम सुरू आहे, तेथेही केवळ ‌‘पीसीसी‌’ आणि ‌‘सोलिंग‌’च्याच स्तरावर काम आहे.

...तर पहिल्याच पावसाने निर्माण होईल पूरस्थिती

बिबवेवाडी-आंबिल ओढा, भैरोबा नाला आणि नऱ्हे येथील नाल्यांलगतची परिस्थिती आजही गंभीर आहे. भीमनगर आणि शीलाविहार कॉलनीतील पाइपलाइनचे काम अजूनही ‌‘सुरू‌’च आहे. जर ही कामे मे महिन्यापर्यंत पूर्ण झाली नाहीत, तर पहिल्याच मुसळधार पावसात पुण्याच्या उपनगरांत पुन्हा पाणी शिरण्याची भीती आहे.

33 ठिकाणी केवळ सर्वेक्षणाचे काम

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत पुणे कॅन्टोन्मेंट, पर्वती, खडकवासला यांसारख्या संवेदनशील मतदारसंघांतील 88 ठिकाणी सीमाभिंती बांधणे अपेक्षित आहे. मात्र, प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्यक्षात केवळ 8 ठिकाणीच काम सुरू झाले आहे. 33 ठिकाणी केवळ ‌‘सर्व्हे‌’ पूर्ण झाला असून, तोही आता ‌‘डीपी मार्किंग‌’साठी महापालिकेच्याच दुसऱ्या विभागाकडे धूळ खात पडला आहे. एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे कागदपत्रे फिरवण्यातच प्रशासनाचा वेळ जात आहे.

शहरात 88 ठिकाणी सीमाभिंतीची कामे केली जाणार आहेत. त्यापैकी 33 ठिकाणी सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहेत. दहा ठिकाणी तातडीने कामे पूर्ण केली जाणार आहेत. त्यापैकी 8 ठिकाणी कामे सुरू झाली आहेत.
सदानंद लिटके, कार्यकारी अभियंता, ड्रेनेज विभाग, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT