Devendra Fadanvis Pudhari
पुणे

Devendra Fadanvis: पुण्याचा चेहरामोहरा बदलणार; मेट्रो, रस्ते व पाणी योजनांमुळे शहर आधुनिक होणार: मुख्यमंत्री फडणवीस

कोंढवा येथे पाणी टाक्यांचे लोकार्पण व उड्डाणपुलाचे भूमिपूजन; तीन ते चार वर्षांत प्रकल्प पूर्ण होणार असल्याचा विश्वास

पुढारी वृत्तसेवा

पुणे/कोंढवा: पुण्याला आधुनिक शहर करण्याचे प्रयत्न गेल्या दहा वर्षांपासून सुरू असून, मेट्रोचे जाळे, चांगले रस्ते व भुयारी मार्गाचे जाळे तयार करण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक कोडींचा प्रश्न सुटून वेगाने पुढे जाता येईल. पुढच्या तीन ते चार वर्षांत प्रकल्प पूर्ण झाल्यावर पुण्याचा चेहरामोहरा बदलणार आहे. तसेच, देशातील आधुनिक शहर अशी पुण्याची ओळख होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पुणे महापालिकेच्या माध्यमातून महंमदवाडी येथे समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या पाण्याच्या साठवण टाक्यांचे लोकार्पण आणि मुंढवा येथील महात्मा फुले चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. या समारंभाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महापौर मंजूषा नागपुरे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार चेतन तुपे, योगेश टिळेकर, उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, सभागृह नेते गणेश बिडकर, विरोधी पक्षनेते नीलेश निकम, आयुक्त नवल किशोर राम आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, कोंढवा भागात आज पाणी पोहचत आहेत. येथील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी अनेकांनी माझ्याकडे पाठपुरावा केला होता. समान पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देऊन आम्ही हा प्रश्नमार्गी लावला. ही योजना अंतिम टप्प्यात आहे. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री असताना अजित पवार यांनी या योजनेचा सातत्याने आढावा घेऊन या भागातील नागरिकांनी पाणी मिळावे, यासाठी आग््राह होता. दोन महिन्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्यासमवेत आम्ही आढावा घेऊ, समान पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले तर आपण पुणेकरांना रोज स्वच्छ पाणी देऊ. समाविष्ट 12 गावांची 890 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. त्यामुळे या गावांचा पाण्याचा प्रश्न सुटेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री म्हणाले, कात्रज- कोंढवा रस्त्याचा रखडलेला प्रश्नही मार्गी लागला आहे. पुण्याचे विमानतळ, रिंगरोड, हडपसर ते यवत दुमजली रस्ता या कामांमुळे पुण्याची कनेक्टिव्हिटी चांगली करता येईल. पुणे महत्त्वाचे शहर आहे. जीसीसी कॅपिटल आहे. उत्तम वाहतूक, राहण्यायोग्य शहर, पायाभूत सुविधा देणे गरजेचे आहे. मेट्रो, चांगले रस्ते आणि भुयारी मार्गाचे जाळे उभारून वाहतुकीला वेग देण्याचे नियोजन आहे. त्यासाठी सर्वांची साथ मिळत असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

शाश्वत व शुद्ध पाणी देण्यासाठी कटिबद्ध

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, पाण्याच्या टाक्यांच्या भूमिपूजनापासून या कामांवर अजित पवार यांचे बारकाईने लक्ष्य होते. गुणवत्तापूर्वक कामे दादांनी केली आहेत. पाण्याचा वापर व्यवस्थित करा. शाश्वत व शुद्ध पाणी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT